पुणे – वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील आजी-माजी आमदर पुन्हा एकदा आमने सामने आले असून, मतदारसंघातील विकासकामांवरून दोघांनी एकमेकांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला. वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित कामांवरून विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांनी महापालिकेसमोर आंदोलन केले.
या आंदोलनांवरून माजी आमदार जगदीश मुळीक “हे आंदोलन म्हणजे आमदार टिंगरे यांचा निष्क्रियतेचा भोपळा फुटल्याचा पुरावा आहे.’ अशी टिका केली आहे. तर मोदी लाट असतानाही मतदारांनी जगदीश मुळीक यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत घरी बसवित त्यांच्या निष्क्रियतेचा पुरावा दिला आहे. अशी टीका आमदार सुनील टिंगरे यांनी केली आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून विकासकामांबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर आमदार टिंगरे यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे.
काय म्हणाले माजी आमदार मुळीक
वडगाव शेरी मतदार संघाचे आमदार सुनील टिंगरे यांनी पुणे महापालिका प्रशासनाच्या विरोधात केलेले उपोषण म्हणजे त्यांच्या निष्क्रियतेचा भोपळा फुटला असेच म्हणावे लागेल. मतदारसंघात भाजपच्या माध्यमातून विविध विकास कामे आणि प्रकल्प पूर्णत्वास येत आहेत. मी आमदार असताना प्रस्तावित केलेली अनेक कामे आता पुर्णत्वास आली आहे.
या पार्श्वभूमीवर टिंगरे यांची निष्क्रियता आणि अकार्यक्षमता मतदारांसमोर आली आहे, या भीतीतून त्यांनी उपोषणाचा स्टंट केला. राज्यात तीन वर्षे महाविकास आघाडीचे सरकार होते. त्या काळात राज्य शासनाच्या माध्यमातून टिंगरे यांना वडगाव शेरी तील मोठ्या प्रकल्पांसाठी शून्य निधी मिळाला. आपले अपयश लपविण्यासाठी टिंगरे हे सातत्याने भाजपने पुढाकार घेऊन सुरू केलेल्या किंवा सुरू करीत असलेल्या प्रकल्पाबाबत पत्रव्यवहार करतात आणि त्या कामाचे श्रेय घेण्यासाठी पुढे येतात.
काय म्हणाले आमदार टिंगरे
वडगाव शेरी मतदारसंघातील नागरिकांनी 2019 ला जगदिश मुळीकांना घरी पाठवून ते किती निष्क्रिय आहेत हे दाखवून दिले आहे. मोदी लाटेतही त्यांना निवडून येता आले नाही. आता माझ्या कामांचा धडका पाहून मुळीकांच्या पायाखालची वाळू सरकरली आहे. असा पलटवार आमदार सुनिल टिंगरे यांनी केला.
राजकिय आरोप न करता केवळ मतदारसंघातील प्रश्नांसाठी मी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला. मात्र, या उपोषणाला केवळ मतदारसंघातूनच नाही तर शहरातून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मुळीक घाबरले. खरे तर पाच वर्ष ते आमदार होते. महापालिकेत त्यांची एकहात्ती सत्ता होती. असे असताना त्यांना हे प्रश्न सोडविता आले नाहीत. मी विरोधी पक्षात असून मतदारसंघासाठी सर्वाधिक निधी आणला आहे. प्रमुख प्रश्न मार्गी लागत आहे. त्यामुळे घाबरलेले मुळीक निरर्थक बडबड करत आहेत.