नवी दिल्ली – संसदेच्या सुरक्षेतील मोठी त्रुटी झाल्याची घटना बुधवारी घडली. सभागृहाच्या कामकाजादरम्यान प्रेक्षकांच्या गॅलरीतून दोन जणांनी चेंबरमध्ये उडी घेतल्याने उघडकीस आली. त्यानंतर त्यांनी स्मोक क्रॅकर फोडून धूर केला आणि घोषणाबाजी केली. यातील चौघांना अटक करण्यात आली असून त्यापैकी एकजण लातूर जिल्ह्यातील आहे. अमोल शिंदे (Amol Shinde) असं या युवकांचं नाव असून तो पोलीस व सैन्य भरतीची तयारी करत होता, अशी माहिती समोर आली आहे. याप्रकरणाची राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अमोल शिंदेची दुसरी बाजू देखील मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
लातूरमधील चाकूर तालुक्यातील झरी बु. येथील अमोल धनराज शिंदे याने चार दिवसांपूर्वीच गाव सोडले होते. गेल्या सहा महिन्यात तो तीन-चार वेळा दिल्लीला गेल्याची माहिती समोर आली आहे. तो सैन्य भरतीसाठी अनेकदा बाहेरगावी जात असे, अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांकडून समोर आली आहे. शिक्षण शिकूनही, रनिंगमध्ये पहिलं येऊनही भरती होत नाही, म्हणून तो व्यथित होता, असे त्याच्या आईने म्हटले.
जितेंद्र आव्हाड यांनी अमोल शिंदेच्या आईचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी मीडियासमोर आपली व्यथा मांडली आहे. हा व्हिडिओ शेअर करत आव्हाड यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, ” देशाच्या संसदेत जो प्रकार घडला त्याचा मी जाहीर निषेध करतो. त्या कृतीचं कुठल्याही प्रकारे समर्थन करता येणार नाही आणि मी स्वत: ते करत नाही,हे सर्वप्रथम इथे नमूद करू इच्छितो. त्यासोबतच ज्या तरूणाने हे कृत्य केलं तो अमोल शिंदे, महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील असल्याने या प्रकरणाची दुसरी बाजूही जाणून घ्यायला हवी.”
देशाच्या संसदेत आज जो प्रकार घडला त्याचा मी जाहीर निषेध करतो. त्या कृतीचं कुठल्याही प्रकारे समर्थन करता येणार नाही आणि मी स्वत: ते करत नाही,हे सर्वप्रथम इथे नमूद करू इच्छितो.
त्यासोबतच ज्या तरूणाने हे कृत्य केलं तो अमोल शिंदे, महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील असल्याने या… pic.twitter.com/b4J62NNVqz— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 13, 2023
पुढे त्यांनी लिहिले की, “मी इथे शेअर केलेला व्हिडिओ अमोलच्या आई-वडिलांचा आहे.आपला मुलगा शिकलेला आहे आणि अनेक वर्ष नोकरीसाठी धडपडतोय,असं ते सांगतायत.खेळात चांगली कामगिरी करूनही पोलिसात भरती होता आलं नाही आणि काही लोकं लाखभर रूपये भरून भरती होतायत. राज्यातील बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या वास्तवाकडे दुर्लक्ष कसं करणार? आज अमोलने जो गुन्हा केलाय, त्यासाठी व्यवस्था त्याला शिक्षा देईल. मात्र, ज्या व्यवस्थेने त्याला हे करायला भाग पाडलं त्याला कोण आणि कशी शिक्षा करणार?” असा सवालही आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
या कटात 6 जणांचा सहभाग होता
या कटात सहा जणांचा सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे. यातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, तर दोन आरोपींचा शोध सुरू असल्याचे सांगितले जात आहे. हे सर्व आरोपी दिल्लीबाहेरून आले होते, त्यापैकी ५ आरोपी गुरुग्राममध्ये एकाच ठिकाणी थांबले होते. हे आरोपी गुरुग्राममध्ये ललित झा नावाच्या व्यक्तीच्या घरी थांबले असल्याचेही सांगितले जात आहे. अटक करण्यात आलेल्या चौघांमध्ये नीलम नावाच्या महिलेचाही समावेश आहे.
संसदेच्या सुरक्षेचा भंग करणाऱ्या चार जणांना दिल्ली पोलिसांनी संसद मार्ग पोलिस ठाण्यात आणले आहे. तेथे अँटी टेरर युनिट स्पेशल आणि गुप्तचर यंत्रणा त्यांची चौकशी करत आहेत. संसदेबाहेरून पकडण्यात आलेल्या नीलम आणि अमोल यांच्याकडे मोबाईल फोन नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यांच्याकडून कोणतेही ओळखपत्र किंवा बॅग जप्त करण्यात आलेली नाही. दोघांनीही कोणत्याही संघटनेशी संबंध नसल्याचे सांगत ते स्वतःच्या इच्छेने संसदेत गेले असा त्यांचा दावा आहे.