मैत्रीचं नातं हे आपलं आयुष्य समृद्ध करत. मित्र-मैत्रिणी आपल्या आयुष्यात असणे, मैत्रीचं जाळ आपल्या भोवती असण्यामुळे आपलं मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होते. मैत्री ही कोणामध्येही व कोणत्याही वयात होऊ शकते. गरीब, श्रीमंत, रंग, वय, उंची या कशाचेही बंधन मैत्रीला नसते. अगदी लहान वयापासून मैत्रीची सुरुवात होते चांगली मैत्री आपलं आयुष्य समृद्ध करते.
कोणत्याही परिस्थितीत आपल्या बाजूने ठाम उभे राहते, आपले गुण दोष यासकट आपल्याला स्वीकारते, अशी मैत्री जपणारा एक तरी मित्र- मैत्रीण आपल्या आयुष्यात असणे म्हणजे पर्वनीच. मैत्रीच्या नात्यात एकमेकांसाठी जसा आदर असतो तसाच त्यागही असतो. स्वतःच्या पलीकडे विचार करण्याची क्षमता मनाला मैत्रीच्या नात्याकडे घेऊन जाते. मैत्रीमध्ये दोन्हीही बाजूने केवळ स्वीकार असतो. मैत्री हा सर्व प्रकारचे नाती घट्ट टिकवून ठेवणारा धागा असतो.
आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कोणताही ताण असेल, परिस्थिती बिकट झाली असेल तर आपल्या आजूबाजूला मैत्रीचे जाळे असेल तर कोणत्याही परिस्थितीला तोंड देणे सोपे होते.चांगल्या मित्रांमुळे सकारात्मकता येते. व्यक्तिमत्वामध्ये बदल होतो.
‘शेअरिंग इज केअरिंग’ या वाक्यप्रमाने मनातील गोष्टी शेअर केल्यामुळे ताण तणाव कमी होतात. आपण कुठे चुकत असू तर तिथे ठामपणाने आपल्याला सांगणारे मित्र असावेत.
सध्याच्या धावपळीच्या युगात चांगले मित्र-मैत्रिणी असणं, चांगले नातेसंबंध असणं या गोष्टी कमी व्हायला लागल्या आहेत. वाईट गोष्टी करण्यासाठी एकमेकांच्या संपर्कात येणे, व्यसनाची सुरुवात करणं अशा गोष्टी मैत्रीमध्ये घडताना आपण आजूबाजूला बघतो. मैत्री करताना आपण काही गोष्टी आवर्जून पाहायला पाहिजेत ज्या मैत्रीमध्ये आपलं नुकसान होणार असेल तर ती मैत्री असू शकत नाही.
मैत्री मध्ये या गोष्टी नसाव्यात.
आपलं नुकसान करणारी मैत्री नसावी. स्वार्थ साधण्यासाठी केलेली, काहीतरी उद्देश साध्य करण्यासाठी केलेली मैत्री, वाईट गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहित करणारी, कठीण प्रसंगी साथ न देता पळ काढणारी, आपलं नुकसान होत आहे हे समजून सुद्धा त्याच गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहित करणारी, व्यसनांच्या खाईत नेणारी अशा प्रकारची मैत्री आपण टाळायला हवी, ज्यामुळे आपलं भवितव्य धोक्यात येणार आहे.
काही अपवाद वगळता मैत्री ही निखळ समृद्ध करणारी असते. त्यामुळे चांगले मित्र मैत्रीण आपल्या सोबत असणं व ते वाढवणे समृद्ध करत. मैत्री आपल्याला मजबूत बनवते. त्यामुळे आपल्या सोबत निखळ निस्वार्थी मित्र असणे व ती मैत्री आयुष्यभर टिकवणे हे आपल्या सुंदर आयुष्यासाठी संजीवनी आहे.दुःख अडवायला उंबऱ्या सारखा.. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा..अशी मैत्री आपण जपायला हवी.