उरुळी कांचन, (वार्ताहर) – शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत नवीन कालव्याचा लोखंडी कठडा तोडून एक चारचाकी गाडी पाण्यात पडल्याची घटना घडली. या घटनेत चारचाकी चालकाचा जागेवरच मृत्यू झाला तर तिघेजण जखमी झाले आहेत.
गुरुवारी (दि. 23) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हा अपघात एवढा भीषण होता की चारचाकी गाडी पुलावर लावलेला लोखंडी कठडा तोडून कालव्याच्या पाण्यात पडली. अमर साहेबराव घाडगे (वय 28, रा. जुन्नर) असे अपघातात मृत्यू झालेल्या चारचाकी चालकाचे नाव आहे.
तर या अपघातात गणेश संजय थोरात (वय 22), शुभम शंकर इंगोले (वय 21, रा. दोघेही केसनंद) व आदित्य महादेव तावरे (वय 20, रा. जुन्नर) असे जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत. अपघातातील चौघेजण मित्र असून बकर्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत होते. रोजच्या प्रमाणे गुरुवारी सकाळी वाघोली येथून सातारा जिह्यातील फलटण या ठिकाणी बकर्या खरेदी करण्यासाठी घरून सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास निघाले होते.
उरुळी कांचनवरून जेजुरीच्या दिशेने जात असताना शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील नवीन कालव्यावर अमर घाडगे चालवीत असलेल्या चारचाकी गाडीचे नियंत्रण सुटले व गाडी थेट लोखंडी कठडा तोडून थेट पाण्यात कोसळली. ही गाडी कोसळल्याचा मोठा आवाज झाल्याने कालव्याच्या बाजूला राहणारे नागरिकांनी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली.
यावेळी परिसरात राहणारे सचिन उर्फ बाळा महाडिक, परिसरातील नागरिक व कदम रुग्णवाहिकेचे वैभव कदम व त्यांच्या सहकार्यांनी गाडीत अडकलेल्या चौघांना तत्काळ मदत करीत गाडीतून बाहेर काढले. या घटनेत गणेश थोरात, शुभम इंगोले व आदित्य तावरे व अमर या चौघांनाहि गाडीतून बाहेर काढले.
यावेळी अमर हा कोणतीही हालचाल करीत नसल्याचे लक्षात आले तसेच त्याच्या डोक्याला गंभीर झाल्याचे दिसून आले. तो निपचित पडला असल्याचे दिसून आला. दरम्यान, कोणतीही हालचाल करीत नसल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला असल्याचे उपस्थित असलेल्या नागरिकांनी सांगितले. तसेच वरील तिघांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी रस्त्यावर गडी पाण्यात पडलेली पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
उरुळी कांचन पोलिसांबद्दल नाराजी..
अपघाताची घटना घडल्यानंतर काही नागरिकांनी पोलीस ठाण्यातील नंबरवर फोन करून माहिती देण्यात आली होती. तरीही दीड तास झाल्यानंतर दोन पोलीस हवालदार त्या ठिकाणी पोहोचले. भविष्यात एखादी गंभीर घटना घडली तर याला जबाबदार कोण राहणार असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे.