श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- भंडारदरा धरणातून शेतीसाठी सुरू असलेले पाण्याचे आवर्तन पुरेशा दाबाने मिळणार असल्याने तसेच कोणीही पाटपाण्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल, असे लेखी आश्वासन पाटबंधारे विभागाने दिल्यानंतर शुक्रवारी (दि.२४) लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे नेतृत्वाखालील मोर्चा स्थगित करण्यात आल्याची माहिती लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ यांनी दिली.
भंडारदरा धरणातून शेतीसाठी आवर्तन सुरू आहे. तथापि, धरणातून सोडण्यात आलेले पाणी श्रीरामपूर भागातील कालव्यांना पुरेशा दाबाने पाणी उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उभ्या पिकांचे भरणे होऊ शकणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली होती. धरणात पाणी उपलब्ध असूनही उभी पिके करपण्याची दाट शक्यता असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत होता. तालुक्यातील शेतकऱ्यांत मोठा संताप या विरोधात खदखदत होता.
श्रीरामपूर तालुक्याचे भंडारदरा धरणात ३८ टक्के पाणी हिस्सा असूनही प्रत्येक आवर्तनात सदर पाणी मिळत नाही, असे पाटबंधारे विभागाच्या माहितीच्या आधारे दिसून आले आहे. आज रोजी एन. बी. शाखेवरील उंदिरगाव, माळेवाडी, सराला, मुठेवाडगाव, खैरी, दिघी आदी बहुतांश गावांचे सिंचन अपूर्ण आहे.
ही बाब लक्षात घेऊन श्रीरामपूर भागात प्रवरा डाव्या कालव्यांना तातडीने पुरेशा दाबाने पाणी सोडण्यात यावे; जेणेकरून उभ्या पिकांचे भरणे होईल, या मागणीसाठी श्रीरामपूर येथील पाटबंधारे कार्यालयावर माजी आमदार श्री.मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा आयोजित करण्यात आला होता.
तथापि, वडाळा पाटबंधारे उपविभाग यांनी दि.२३ मे रोजी दिलेल्या लेखी पत्राद्वारे निळवंडे धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग हा वाढविण्यात आलेला आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे चालू विसर्गातून पुरेशा दाबाने नमुना क्र.७ द्वारे पाणी मागणी नोंदविलेली असूनही पाटपाण्यापासून वंचित राहिलेल्या पिकांना पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
त्यापैकी कोणीही पाटपाण्यापासून वंचित राहणार नाही, असे लेखी आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निवेदनातील मागणी मान्य झाल्याने लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे नेतृत्वाखालील मोर्चा स्थगित करण्यात आल्याची माहिती धुमाळ यांनी दिली.
शेतकरी संघटनेनेही दिला होता इशारा
शेती सिंचन अपूर्ण राहिल्यास शेतकरी संघटना कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयास कायमस्वरूपी कुलूप ठोकणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनीही दिला होता.