नवी दिल्ली -कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पुन्हा हिंसाचारग्रस्त मणिपूरच्या मुद्द्यावरून पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. मणिपूर जळत असताना संसदेत चेष्टामस्करी करणे, हसत-हसत बोलणे पंतप्रधानांना शोभणारे नाही, असे त्यांनी म्हटले.
लोकसभेत गुरूवारी विरोधकांनी मोदी सरकारविरोधात आणलेला अविश्वास ठराव फेटाळला गेला. त्याआधी ठरावावरील चर्चेला उत्तर देताना मोदींनी विरोधकांवर टीकेची झोड उठवली. मोदींच्या त्या भाषणाचा समाचार राहुल यांनी पत्रकार परिषदेत घेतला. मोदींनी दोन तासांपेक्षा अधिक काळ भाषण केले. मात्र, मणिपूरवर ते केवळ दोन मिनिटे बोलले. दोन तास ते केवळ चेष्टामस्करी करत होते.
मणिपूर जळत रहावे अशी त्यांची इच्छा आहे. मणिपूरमध्ये जे काही घडत आहे; ते भारतीय लष्कर केवळ दोन दिवसांत रोखू शकते. पण, मणिपूरमधील आग विझवण्याची मोदींची इच्छा नाही, असा आरोप त्यांनी केला. पंतप्रधानपदी असणाऱ्या व्यक्तीने राजकारणी म्हणून वागू-बोलू नये, असा शाब्दिक टोलाही त्यांनी लगावला.
राहुल यांनी लोकसभेत बोलताना भाजपने मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केल्याचा आरोप केला होता. त्या वक्तव्याचे राहुल यांनी समर्थन केले. मणिपूर दौऱ्यावेळी मला केंद्रीय सुरक्षा जवानांनी जे घडतेयं ते कधीच पाहिले नसल्याचे सांगितले. मणिपूरचे दोन भाग बनले आहेत. खरेतर, राज्य म्हणूनच मणिपूर अस्तित्वात नसल्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे लोकसभेत मी तशी भूमिका मांडली, असे त्यांनी नमूद केले.