विजय शेंडगे
मुलांवर संस्कार करण्याची खरी जबाबदारी पालकांची. त्यापाठोपाठ शिक्षकांची. समाज हाही घटक मुलांवर संस्कार करण्यात प्रमुख भूमिका बजावत असतो; परंतु समाज संस्कार करतो असं म्हणण्यापेक्षा आयुष्याच्या वाटचालीत समाज,
बालमनाभोवती अनेक भले-बुरे संस्कार उभे करतो आणि त्यातील काय घ्यायचे? काय सोडून द्यायचे? ही जबाबदारी व्यक्तिगत असते. पुस्तकेदेखील बालमनावर फार उत्तम संस्कार करू शकतात.
परंतु आईवडील, शिक्षक, समाज, पुस्तके या बालमनावर अथवा तरुणाईवर संस्कार करणाऱ्या विभिन्न घटकांपैकी आई-वडील आणि शिक्षक हे दोन घटक वगळता समाज उत्तम संस्कार करेलच असे खात्रीने सांगता येत नाही.
कारण समाज चांगल्या-वाईटाने भारित झालेला आहे. तुम्ही संस्कारक्षम पुस्तके वाचली तरच तुमच्यावर उत्तम संस्कार होण्याची शक्यता निर्माण होते. किशोर, चंपक, चांदोबा अशी मासिकं वाचून मधल्या काही पिढ्या मोठ्या झाल्या.
इलेक्ट्रॉनिक माध्यमं पंख पसरण्यापूर्वी मुलांना भुरळ पाडेल असं साहित्य निर्माण केलं जायचं. अद्भुत, धाडसी, जादूच्या गोष्टी वाचताना त्या गोष्टींमध्ये मुलं त्या गोष्टीत हरवून जायची. आजी गोष्टी सांगायची.
परंतु अलीकडच्या मोबाइलच्या स्क्रीनमध्ये हरवून गेलेल्या आणि ऑनलाइन शिक्षणाचे धडे गिरवू बघणाऱ्या बालमनावर संस्कार कोण करणार? असा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कुटुंब व्यवस्थेतून आजी-आजोबा हरवत चालले आहेत.
आई-बाबा दोघेही अधिकाधिक अर्थार्जन करून जीवन भौतिक सुखांनी समृद्ध करण्याच्या व्यापात व्यस्त आहेत. मुलं पुस्तकं वाचतात की नाही याकडे कोणाचंही लक्ष नाही. गुण म्हणजे गुणवत्ता हा समज दृढ झाला आहे.
प्रत्येकजण शालेय परीक्षेत अधिकाधिक गुण मिळवण्यासाठी जे वाचायला हवं त्या पलीकडे काहीएक वाचण्याच्या फंदात पडत नाही. आक्रस्ताळी “शिंच्यान’ आणि लहान मुलांचे स्क्रिप्टेड रिऍलिटी शो मुलांवर कोणते संस्कार करत असतील?
मुलांनी वाचायलाच हवं. त्यासाठी त्यांच्या बालमनाला पोषक ठरेल अशा साहित्याची निर्मिती व्हायला हवी. परंतु अलीकडच्या काळात मुलांना गुंतवून टाकेल अशा बालसाहित्याची निर्मिती होताना दिसत नाही. अशावेळी वि. दा. पिंगळे यांनी “संस्काराच्या पारंब्या’ या पुस्तकाच्या माध्यमातून लहान मुलांवर संस्कार होतील अशा गोष्टी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. या गोष्टीत अद्भुतता नाही. जादू नाही.
लहान मुलांच्या आयुष्याशी निगडित अशा या गोष्टी आहेत. परिस्थितीशी झगडा करून लौकिक प्राप्त करणारी, आयुष्याशी झगडणारी, आयुष्याला यश शिखराच्या दिशेने घेऊन जाणारी मुलं या गोष्टींमध्ये भेटतात. या संस्काराच्या पारंब्या मुलांच्या मनात रुजायला हव्यात. कारण ती काळाची गरज आहे.