– चारूशीला बेलसरे
कविता स्फुरते कशी? या प्रश्नाचं उत्तर सहज देता येणार नाही. कारण कवितेतील शब्द, भावभावना या अंतःकरणातून येतात. हृदयातील मनाला साद घालणारे शब्द ओठावर व ओठातून झालेले प्रगटीकरण म्हणजे कागदावर उतरलेली कविता होय. चिंतन आणि मननातून मनोहारी कविता साकारते. याची प्रचिती स्वरमहिमा प्रकाशनाने प्रकाशित केलेला “ओंजळीतील मोती’ हा कथासंग्रह होय.
अंजली देशपांडे यांचा हा पहिलाच कवितासंग्रह असला तरी या कवितासंग्रहातील एकूण 80 कविता सर्वच्या सर्व अतिशय वाचनीय आहेत. त्यातील काही कविता प्रचलित गीते, कविता यांच्या आठवणींना उजाळा देतात. देशपांडे या लेखिका, कवयित्री असून त्यांचे लेखन वृत्तपत्रे, मासिके, दिवाळी अंक यातून वेळोवेळी प्रसिद्ध झाले आहे. विशेषतः भावनाप्रधान, तत्त्वचिंतनपर कविता हे त्यांचे वैशिष्ट्ये “ओंजळीतील मोती’ या कवितासंग्रहात सातत्याने जाणवते.
ओंजळीतील मोती या कवितासंग्रहातील कविता आई-मुलगा, मुलगी या नात्यातील वीण घट्ट करणारी कविता असे म्हणता येईल. योग्य वयात स्वप्नातील जोडीदार मिळाल्याने स्वप्न साकारल्याचा आनंद एका कवितेत प्रभावीपणे व्यक्त झाला आहे. जीवनाची वाटचाल काट्याकुट्यांनी तसेच गुलाब पाकळ्यांची असल्याचा अनुभव कवयित्री सांगतात. “माझं माहेर’ कविता माहेराची आठवण करून देणारी तसेच माहेरची आठवण जागवणारी म्हटली पाहिजे.
प्रेमभावना जपणारी प्रेम कविता छान आहे. “जीवनगाणे’ या कवितेतून जीवनावर प्रेम करण्याचा विचार मांडणारी कविता म्हणून लक्षात राहते. स्वतः आनंदी राहून दुसऱ्याला आनंदी करणारे सामान्यातले सामान्यच असतात. तर घरासारखे सर्वांना सामावून असणारे घर असावे, असा संदेश एका कवितेतून दिला आहे. पैशाचा हव्यास नसावा याबद्दल कवयित्री एका कवितेत सांगतात.
संसारात पती-पत्नीची साथ भक्कम हवी, तर संसार सुख-समाधानाने होतो, याचे चिंतन “संसार’ या कवितेत केले आहे. मनाचे सौंदर्य सहज मिळत नाही, ते मिळवावे लागते. हा विचार एका कवितेत सहजतेने व्यक्त झाला आहे. एकंदरीत “ओंजळीतील मोती’ या कविता संग्रहातील रोजच्या जीवनाशी जोडलेल्या कौटुंबिक नात्यातून साकारलेल्या आहेत. त्यामुळे आई-वडील, मुलगा-मुली-सून, आजोबा-आजी-नातवंडं, पती-पत्नी या नात्यातील संबंधाना जोडणाऱ्या कविता वाचकांना निश्चित आवडतील.
पृष्ठे 120, मूल्य 100 रूपये