– विजय शेंडगे
“तीन पानांचा पळस’, “पदर’, “उजेडाचे गाव’, “भाकरदाणे’ असे चार कवितासंग्रह. “आई’ हे दीर्घकाव्य. चित्रपटासाठी, ध्वनिमुद्रिकांसाठी गीतलेखन अशी काव्यक्षेत्रात चौफेर मुशाफिरी केलेल्या कवी धनंजय सोलंकर यांचा “आरव’ हा पाचवा कवितासंग्रह नुकताच रसिकांच्या भेटीला आला आहे. अत्यंत रुक्ष अशा पोलीस खात्यात सेवा करताना काव्यरूपी वीज हातात धरणं ही सोपी बाब नव्हती.
परंतु धनंजय सोलंकरांनी चांदणं हाती धरावं इतक्या सहजतेने ही वीज हाती धरली. ही कविता सामाजिक भेदाविषयीचा आरव आहे. ही कविता माणसातील हरवत चाललेल्या माणुसकीच्या विरोधातील आरव आहे. ही कविता स्वार्थी राजकीय व्यवस्थेच्या विरोधातील आरव आहे. “असेन मी एकटा’ ते म्हणतात-
लाख लढाया झाल्या, हरलो कधीच नाही
गाथा पराक्रमाची, ऐकतो एकटा मी
या लढाया माणसातल्या हरवलेल्या नीतिमत्तेशी आहेत. या लढाया माणसातल्या दांभिकते विरोधात आहेत. या लढाया हरवलेल्या मानवी मूल्या विरोधात आहेत. पण या लढाया जिंकल्या, तरी ती पराक्रमाची गाथा मी एकटाच ऐकतो आहे, असं कवी म्हणतो.
कवी धनंजय सोलंकर यांची स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांवर श्रद्धा आहे. परंतु बोकाळत चाललेला चंगळवाद, विक्राळ रूप धारण करत असलेला स्वार्थ, फोफावलेली आत्मकेंद्री वृत्ती या सगळ्याची त्यांना भयंकर चीड आहे. “शपथ’ या कवितेत असंच एक शब्दचित्र आहे. तसंच शब्दचित्र “नवसाचे दिवस’ या कवितेत आढळून येतं.
कोणतीही आर्थिक तोशीस बसत नसतानाही शेजाऱ्यांना प्रकाशचं दान देण्याचं पुण्य लाथाडणारी ही मनोवृत्ती किती वाईट आहे. या कवितेला कुठलाही बंध नाही. लय नाही. कारण कविता या मुक्त छंदातील आहेत. असं असलं तरी विठू सावळा या कवितेतील-
काळ्या मातीचे जसे देखणे
हिरवे हिरवे रान
तसाच माझा विठू सावळा
आतून गोरा पान
यासारख्या ओळी लक्ष वेधून घेतात.
चंद्र सूर्य दोघे असुनी अब्दागीर माझे
उजेड शोधण्यात गेली, सारी हयात राजे
या ओळींमधील कल्पना आणि विरोधाभास अद्भुत वाटतो. पण चंद्र सूर्य अब्दागीर असणाऱ्या माणसाला उजेडाची विवंचना का पडावी, या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही. या संग्रहात ग्रामीण बाजाची भाषा येते. परंतु हा कवितासंग्रह पूर्णपणे ग्रामीण व्यवस्थेविषयी बोलत नाही.
मुळात तो कोणत्याच व्यवस्थेविषयी भाष्य करत नाही. तो मानवी जीवनाविषयी भाष्य करण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याच ठिकाणचा प्रत्ययांचा वापर औचित्यभंग करतो. अनुभवांच्या वाढत्या समृद्धतेसोबत कविता समृद्ध होत जाते. अशी समृद्ध झालेली कविता धनंजय सोलंकर यांच्या पुढील वाटचालीत बघायला मिळेल असा विश्वास आहे.
प्रकाशन : संवेदना प्रकाशन / पृष्ठे : 96 मूल्य : 180