कोपरगाव -ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी काल (सोमवार)पासून सुरू झाली असून, निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ बंद पडल्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकही उमेदवारी अर्ज भरला गेला नाही. हा तांत्रिक दोष तातडीने दूर करण्यात यावा आणि निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी उमेदवारांकडून पारंपरिक ऑफलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज स्वीकारावेत व त्यासाठी जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाकडून परवानगी घ्यावी, अशी सूचना माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघात एकूण 21 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्या असून, त्यामध्ये कुंभारी, घोयेगाव, ब्राह्मणगाव, वारी, कान्हेगाव, जवळके, धोत्रे, बोलकी, सुरेगाव, लौकी, मुर्शतपूर, चांदगव्हाण, दहेगाव बोलका, कारवाडी, पोहेगाव, शहाजापूर, मंजूर या 17; तर मतदारसंघात समावेश असलेल्या राहाता तालुक्यातील वाकडी, धनगरवाडी, चितळी, पुणतांबा-रस्तापूर या 4 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याचा कालावधी दि. 16 ते 20 ऑक्टोबरपर्यंत असून, राज्यभरात ग्रामपंचायतच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, पहिल्याच दिवशी निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ (वेबसाईट) बंद पडल्यामुळे जिल्ह्यात एकाही उमेदवाराला उमेदवारी अर्ज भरता न आल्याने एकच गोंधळ उडाला.
उमेदवारी अर्ज भरण्यास आता फक्त चार दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाइन अर्ज भरण्याची परवानगी उमेदवारांना द्यावी. त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी ताबडतोब तसा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे सादर करून ऑफलाइन अर्ज स्वीकारण्याबाबत आयोगाकडून मान्यता घ्यावी, अशी मागणी कोल्हे यांनी केली आहे.