साठी ओलांडलेले वासूकाका समोर आलेले जीवन जगत होते. मुले परदेशी जाऊन दहा वर्षांचा काळ लोटलेला. रक्ताची नाती पातळ होऊन विरून जातात ही दाहकता त्यांनी अनुभवलेली. तब्येत चांगली. त्यांचे घर हॉस्पिटलजवळ. फिरायचा रस्ताही तिथूनच. आपले शिल्लक आयुष्य आणि शिल्लक पैसे याचा मेळ घालता येत नाही हेही वास्तव समजलेले!
एक दिवस धडाधडा सगळे जग बंद झाले. अस्मानी संकट आले. वासूकाकांना एकटेपण सवयीचे होते. ते निवांत घरी बसले. सोबतीला पुस्तके होती. टीव्हीवर सिनेमा होते. भडक, अतिरंजित आणि सल्ले देणाऱ्या बातम्या लावण्याची जरूर नव्हती.
रोजचे दूध तीनचार दिवसांनी दिसू लागले. भाजी अदृश्य झाली. एका दिवसाआड दुधाकरीता चक्कर मारावीच लागायची. घराजवळच्या हॉस्पिटलमध्ये रात्रंदिवस सायरन वाजवत रुग्णवाहिका धावपळ करू लागल्या. एक विचित्र असे भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले.
वासूकाकांना सर्वस्वी नवे दृश्य दिसले. हॉस्पिटलबाहेर फूटपाथवर 5-7 वर्षांची तीन लहान मुले झोपलेली दिसली. रडून रडून सुजलेले डोळे. दैना झालेली. रखवालदार त्यांना आत येऊ देत नव्हता. ती पोरं रडायची. वासूकाकांनी रखवालदाराकडे चौकशी केली. “”साहेब, या मुलांचे आईबाप करोनाग्रस्त आहेत. घरात कोणी नाही. पोरं आईबापांबरोबर रुग्णालयात आली व नंतर त्यांना बाहेर काढले. आई-बापांची वाट बघत इथेच बसून आहेत. आम्हालाही वाईट वाटते पण काय करणार?”
वासूकाकांनी मनोमन काहीतरी ठरवले. ती फूटपाथवरची पोरं उचलली. हॉस्पिटलमधील त्या पोरांच्या पालकांना लांबूनच सांगितले, “मी शेजारीच राहतो. माझ्या घरी ही लेकरं घेऊन जातोय.’ त्या पालकांनी सुन्नपणे मान हलवली. त्यांनी आपल्या पाल्यांना सांगितलं, “दादाजी के साथ जाओ! हम तुम्हे लेनेको आऐंगे” पोरं वासूकाकांचे बोट धरून चालू लागली.
वासूकाकांचे घर भरले. त्यांनी तिघांना गरम पाण्याच्या शॉवरने स्वच्छ आंघोळ घातली. मुलांना स्वतंत्र साबणाच्या छोट्या छोट्या वड्या दिल्या. मुलं त्याही दुःखात हरकली. आता कपडे? मुले वासूकाकांचे शर्ट घालून बसली. हॉलमध्ये मुलांना गाद्या घातल्या. वासूकाकांनी भरपूर वरणभात लावला. ब्रेड आणला. भाजी केली. पोरांना भरवले. पोरं त्या रात्री पोटाशी पाय घेऊन शांत झोपली. वासूकाका त्या मुलांचे निरागस चेहरे पाहत बराच वेळ जागे होते.
सकाळी मुलं उठली. त्यांनी जमेल तशा पांघरुणांच्या घड्या केल्या. वासूकाका उशिराने उठले. आधी हॉलमध्ये धावले. पोरांनी “दादाजी गुड मॉर्निंग’ केले. मुलांचे दात घासून दिले. त्यांना चहा टोस्ट दिले. पोरं खात होती पण त्याही बालवयात विचारमग्न होती.
एका मुलाने विचारने, “”दादाजी, मेरी मम्मी कब अच्छी होगी?” मुलीने उत्तर दिले, “”अरे, होगी, होगी” मुलांच्या कोणत्याही प्रश्नाला वासूकाकांकडे उत्तर नव्हते. त्यांनी मुलांचे आवरले. त्यांचे आदल्या दिवशी धुतलेले कपडे घातले. थोड्या दिवसांनी ते मुलांना घेऊन हॉस्पिटलमध्ये आले.
त्यापैकी एका पोरीची आई बरी होऊन घरी निघाली होती. पोरीच्या आईने तिला ताब्यात घेतले. त्यांनी वासूकाकांकडे कृतज्ञतेने पाहिले.
कोणाचा बाप हातगाडी ओढायचा, कोणाचा फेरीवाला होता. कोणी रद्दीच्या दुकानात काम करत होता. जाताना त्या पोरीने सांगितले, “दादाजी अब हमारे घर आयो”. “”जरूर” वासूकाकांनी उत्तर दिले. राहिलेल्या दोघांना वासूकाकांनी समजावले, “”तुम्हारे मम्मीपप्पाभी आयेंगे, तब तक मैं हुँ ना. वासूकाका त्या दोघांना घेऊन परत फिरले. तर फूटपाथवर अजून एक चिमुकली मोडक्या बाहुलीशी खेळत होती. वासूकाकांनी तिच्या मामाशी बोलून तिला बोटाशी धरून आपल्याबरोबर चालवले……साथीचा भर ओसरला. फूटपाथवर मुले येईनाशी झाली. वासूकाकांना हायसे वाटले. एक दिवस अचानक दारावरची बेल वाजली. ती मुले त्यांच्या आईबापांना घेऊन आली होती. “हमारे दादाजी’ म्हणून त्यांनी वासूकाकांना मिठी मारली. “”दादाजी हम आते रहेंगे,” म्हणून गेली. ह्या क्षणाकरीता भगवंताने जगवले, हे वासूकाकांना उमजले.
आनंदीवाट :
श्रीकृष्ण केळकर