जेजुरी -जेजुरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या आणि 788 दशलक्षघन फूट पाणी साठवण क्षमता असलेल्या नाझरे मल्हार सागर जलाशयात केवळ 13 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. हा मृतसाठा समजला जातो. सध्या दर तीन दिवसांनी शहराला पाणीपुरवठा होत आहे.
जेजुरी शहरासाठी पर्यायी व्यवस्था असलेली वीर धरणावरील मांडकी पाणीपुरवठा योजना एक वर्षापासून बंद आहे. या पाणीपुरवठा योजनेचे पाइप निकृष्ट दर्जाचे असल्याने ते अनेक ठिकाणी फुटतात व त्यावर दरवर्षी 10 ते 15 लाख रुपये दुरुस्तीसाठी खर्च करावे लागत असल्याने ही योजना बंद आहे.
जेजुरी शहराला पाणीपुरवठ्याची सध्यस्थीती पहाता मांडकी पाणीपुरवठा योजना पुन्हा त्वरित सुरू करणे गरजेचे आहे. एप्रिल व मे महिन्यातील दिवस हे जत्रा यात्रा उत्सव व लग्नसराईचे दिवस असतात या महिन्यात जेजुरीमध्ये भाविकांची संख्या लक्षणीय असते. जेजुरीवासीय व भाविकांचे हाल होऊ नयेत म्हणून या योजनेचे वीजबिल भरण्यासाठी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करावा तसेच
पाणीपुरवठा योजना तत्काळ दुरुस्त करून कार्यान्वित करावी अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना देण्यात आले. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनीही प्रभारी मुख्याधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत जेजुरी शहराला पुरवठा करणाऱ्या मांडकी योजना दुरुस्तीचा अहवाल तयार करून त्वरित पाठवावा अशा सूचना देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.