बिबवेवाडी, दि. 12 (प्रतिनिधी) -महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहर परिसरातील अनेक वसाहती, सोसायट्या पाण्याखाली गेल्या. गंगाधाम चौकातील रुणवाल पार्क सोसायटीत पावसाचे पाणी आज दुसऱ्या दिवशीही साचून होते. या सोसायटी शेजारी बस डेपो असल्याने तेथून वाहून आलेल्या पाण्यामुळे ऑइल व डिझेलचा तवंग पाण्यावर आला होता. हे पाणी सोसायटीत साचून राहिलेल्याने अनेक ठिकाणच्या भिंती, कॉलम तसेच फरशा घाण झाल्या. पाण्याच्या टाक्यांमध्ये हे पाणी मिसळल्याने पिण्याच्या तसेच वापरण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला.ग्राउंड फ्लोअरचे पार्किंगमध्ये चार फुटापर्यंत पाणी साचल्याने ते उपसण्याचे काम करण्याचे काम सोसायटीने सुरू केले होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पर्वती मतदारसंघाचे अध्यक्ष संतोष नांगरे यांनी या सोसायटी परिसरात जाऊन पाहणी करीत पालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर येथील चेंबरची सफाई करण्यात आली. ग्राउंड फ्लोअरच्या फ्लॅटमध्ये पाणी शिरल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. पिण्याच्या पाण्यात डिझेल, ऑईचे पाणी मिक्स झाल्याने त्या टाक्या स्वच्छ करणे, परिसरातील गाळ साफ करणे, निर्जंतुकीकरण करणे आवश्यक ठरणार आहे. पालिकेने हे काम करून द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सोसायटीकडेने ओढा असल्याने त्याकडेने संरक्षक भिंत बांधणे गरजेचे आहे, हे काम महापालिकेने तातडीने करावे. महापालिकेने हे काम तातडीने कले असते तर पाणी साचले नसते. सभासदांच्या वाहनांचे नुकसान व होणारा त्रास वाचला असता. प्रशासनाने आमच्या समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
– प्रतिभा चोप्रा, अध्यक्ष, रूणवाल पार्क