दौंड तालुक्यात लग्न जमवणाऱ्या फसव्या टोळ्या सक्रीय
देऊळगावराजे- लग्न… प्रत्येकाच्या जीवनातील सगळ्यात महत्त्वची घटना…; पण या शुभघटनेकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत आहसे… नातेवाइकांच्या भेटी कमी होत आहे… किंबहुना नात्यांमध्ये एक वेगळाच दुरावा आला आहे… अशा स्थितीत कोणी सांगेल त्या गोष्टीवर विश्वास ठेवून लग्न ठरवणे आता धोक्याचे होऊ लागले आहे. दौंड तालुक्याच्या पूर्व भागात सध्या अशीच स्थिती निर्माण झाली असून, यात नवरदेवाकडचेच लोक फसवले जात असल्याचे समोर येत आहेण
दौंड तालुक्याच्या पूर्वभागत लातूर, जालना आणि इतर जिल्ह्यांतील काही “एंजट’ मुलांना मुली दाखवून एक ते दोन लाख रुपये मुलीच्या घरच्यांनाच देऊन मुलाचे एकाच दिवसात लग्न ठरवत आहेत, कुठेतरी मंदिरात जाऊन सोनंनाणं घालून लग्नही लावून देत आहेत आणि पुढच्या दोन दिवसांतच आई, भाऊ वगैरे कोणीतीर नातेवाईक आजारी आहेत, असे सांगून नवरीला घेऊन जात असून ते पुन्हा येतच नाहीत. लग्नाचे आमिष दाखवून मुलींना पळवून नेण्याच्या घटना वारंवार घडतात आणि त्याचा घोर मुलींच्या आई-बापांना लागतो. मात्र, सध्या मुलांच्या बाबतीत देखील असेच फसवले जात असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत.
दौंड परिसरात हे एंजट असे लग्नास उतावीळ झालेल्या तरुणांच्या शोधात असून, ते त्याच्याकडून भरपूर पैसे आणि दागिने घेत आहेत, त्यानंतर लग्नाचा बारही उडवून देत आहेत आणि दोन ते तीन दिवसात नवरी गायब करीत आहेत. अशा एजंटांपासून किंवा टोळ्यांपासून सावध राहण्याची गरज आहे.
- दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
दौंडच्या पूर्व भागात आतापर्यत गेल्या दोन महिन्यांत अशा दोन घटना घडल्या आहेत, त्यामुळे या प्रकरणात पैशासाठी मोठ्या टोळ्या सक्रिय झाल्या असल्याचे दिसून येत आहे. याबाबत एका तरुणाने त्याची पूर्ण हकीकत सांगून दौंड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे; पण अजूनही या प्रकरणाचा तपास लागलेला नाही, त्यामुळे दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील तरुणांनी या फसव्या टोळ्यांनापासून सावध राहिले पाहिजे, असे आवाहन दौंड पोलीस स्टेशनच्या वतीने सांगण्यात आले आहे - दौंडमध्ये घडलेल्या या घटनेचा तपास चालू असून, येथून पुढे असे फसवणूक करणारे एंजट कोणाला आढळून असल्यास दौंड पोलीस स्टेशनला त्यांनी त्वरीत संपर्क करावा. पूर्ण चौकशीअंतीच आपल्या जीवनसाथीची निवड करावी. आमिषाला बळी पडू नये.
– ऋषीकेश अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, दौंड