चिंबळी (वार्ताहर)- अनशापोटी चार्यासाठी वणवण भटकताना भुकेनं व्याकुळलेल्या बकर्यांकडं बघून पोटातली आतडी तुटायला व्हतं… आमच्या बकर्याचं कुणाला काई नाय.. आमचं हाल आम्हालाच ठाऊक… काळीज पोखरावी अशी, ही प्रतिक्रिया आहे मरकळ परिसरात भटकणार्या मेंढपाळांची.
सध्या या भागात चारा व पाणी टंचाई जाणवत असून मेंढरांची चार्यासाठी या शिवारातून त्या शेती शिवारात वणवण होत असून मुबलक चाराही उपलब्ध होत नाहीये. मोकळ्या रानात पाल ठोकून वाडा बसवायचा. उघड्यावरच तीन दगडांची चूल मांडायची. चार दिवस इथं तर, चार दिवस दुसर्या रानात… ही भटकंती मेंढपाळांच्या जणू पाचवीलाच पुजलेली असते. पोरं, कोंबड्या, कुत्री, बकर्यांचा बोजबारा घेऊन त्यांची भटकंती सुरूच असते.
सध्या मात्र मैलोन मैलाचा मुलूख पालथा घालूनही त्यांच्या मेंढरांना पोटभर चारा मिळेना. मरकळ परिसर, चर्होली, धानोरे, केळगाव, चिंबळी, सोळू, आदी गावांमध्ये मेंढपाळ पाल टाकून राहत असून दिवसभर परिसरातील शेती शिवारात भटकंती करताना दिसून येत आहेत. यंदा पाऊस जेमतेम झाल्याने चार्याची चिंता जानेवारीपासून होती.
हिरवा चारा राहिला नसल्याने मेंढरांची डोंगरमाळा वरील वाळलेल्या गवतावरच भिस्त होती; परंतु त्याही डोंगरावरील गवताला वणव्याने आग लागल्याने ऐन उन्हाळ्यात मेंढपाळांना शेती शिवारातील पिकांच्या पाल्यावर दिवस काढावे लागत आहे. अजून दोन अडीच महिने हीच परिस्थिती राहणार असल्याने मेंढपाळ चिंतेत पडला आहे.
दरवर्षी प्रमाणे पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये नगर जिल्ह्यातील ढवळपुरी, अळकुटी आदी परिसरातील मेंढपाळ, चिंबळी, मोई, कुरूळी, निघोजे, केळगाव, सोळू, धानोरे, गोलेगाव, मरकळ भागात गेल्या दोन महिन्यांपूर्वी दाखल झाले आहेत; परंतु मेंढापाळांना पाणी व चारा सोधण्यासाठी या गावातून दुसर्या गावात शिवारफेरी करत जावे लागत आहे.
जलपर्णीने इंद्रायणीचे पाणी दूषित
शेतकरी वर्गानी रब्बी हंगामातील कांदा, ज्वारी, गहू व पालेभाज्या व फुलशेती रिकामी केली असल्याने थोडाफार हिरवा चारा व झाडपाला शेळ्यामेंढ्यांना मिळत आहे; परंतु इंद्रायणी नदीचे पाणी जलपर्णीने पूर्णपणे दूषित झाले असल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई मात्र मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे.