वाल्हे, (वार्ताहर) – पुरंदर तालुक्यातील वाल्हेचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्राउत्सव मागील पाच दिवसांपासून उत्साही वातावरणात सुरू आहे. यात्रेनिमित्त अनेक पाव्हणे गावाकडे आले असताना, अनेकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
परिसरातील वाड्या-वस्त्यांना पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला असून, सद्यःस्थितीत सुरू असलेल्या अपुर्या टँकरच्या संख्येमुळे दुष्काळाची छाया अधिक गडद झाली आहे. वाल्हे परिसरातील वाड्या-वस्त्यांमधील नागरिकांना भर उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
वाल्हे व परिसरामधील अंबाजीचीवाडी, मुकदमवाडी, गायकवाड वाडी, भुजबळ कामठवाडी, माळवाडी, गायकवाडमळा, तीन पातरमळे, हनुमानवस्ती, चाहूर, मुलांकी, बापसाईवस्ती, दातेवाडी, वागदरवाडी येथील वागदरवाडी गावठाणसह बाळाजीचीवाडी, मोरूजीचीवाडी, बहिर्जीचीवाडी, झापाचीवाडी, पवारवाडी यांसह पिंगोरी,
आडाचीवाडी, दौंडज, राख आदी गावांमधील वाड्यावस्त्यांवर शासकीय तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, अजितदादा मोटार वाहतूक संघ टँकरच्या दररोज खेपा सुरू आहेत. दरम्यान, या गावांत जलजीवन मिशनची कामे अद्यापपर्यंत पूर्ण झालेली नाहीत; ही कामे त्वरित पूर्ण झाली असती तर, कदाचित पाणीटंचाई जाणवली नसती अशी चर्चा ग्रामस्थांमधून होत आहे.
उकाड्याने नागरिक हैराण
मागील काही दिवसांपासून उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील अनेक विभागांत अवकाळी पावसांच्या सरी कोसळल्या होत्या. वाल्हे परिसरात शेतकरीवर्ग अवकाळी पावसाकडे डोळे लावून बसले असताना त्याने हुलकावणी दिल्याने ग्रामस्थ उकाड्याने हैराण झाले आहेत.
टँकरच्या फे-या वाढवा
पुरंदर तालुक्यातील अनेक गावांत यात्रा- जत्रांचा हंगाम सुरू असून यावर्षी यात्रा-जत्रांवर तीव्र पाणीटंचाईचे संकट ओढावत आहे. ठिकठिकाणी अनेक गावांत वाड्या-वस्त्यांवर टँकरची वाट पाहत अनेकांना ताटकळत बसावे लागत असून शासनाकडून वाल्हे व परिसरामधील वाड्या-वस्त्यांवर टँकरच्या फेर्या वाढवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.