गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्याच्या चार्मोशी तालुक्यात वैनगंगा नदीत नाव उलटून ६ महिला बुडाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. सध्या या महिलांचा शोध घेतला जात आहे. पण अद्याप त्या शोधण्यात यश आले नाही. त्यामुळे त्या दगावल्या असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, चार्मोशी तालुक्यातील गणपूर (रै.) लगत वाहणाऱ्या वैनगंगा नदीत मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली. महिला एका नावेतून वैनगंगेच्या दुसऱ्या तिरावर असणाऱ्या एका गावात मिरची तोडणीसाठी जात होत्या.
नदीच्या मध्यभागी आल्यानंतर अचानक त्यांची नाव उलटली. त्यानंतर नावाड्याने एका महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्याला यश आले नाही. अखेर नावाडी पोहून किनाऱ्यावर आला. त्यानंतर त्याने या घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.
आतापर्यंत एका महिलेचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे. ५ महिला अद्याप बेपत्ता आहेत. बचाव पथकाच्या मदतीने त्यांचा शोध घेतला जात आहे. गणपूरहून चंद्रपूरला जाण्यासाठी दळणवळणाची कोणतीही साधने नाहीत. त्यामुळे अनेकजण जिव धोक्यात घालून वैनगंगा नदीपात्र ओलांडतात. त्यात अनेकदा नाव उलटण्याचा धोका असतो. ताज्या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.