महाबळेश्वर -येस बॅक आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सीबीआय कोठडीत असलेल्या वाधवान बंधुंच्या महाबळेश्वर येथील त्यांच्या बंगल्यात सीबीआयच्या विशेष तपास पथकाने बुधवारी तपास केला. यावेळी तपास पथकासोबत वाधवान बंधुदेखील होते. पाच तास तपास केल्यानंतर वाधवान बंधुंना सोबत घेऊन सीबीआयचे पथक मुंबईकडे रवाना झाले.
उद्योगपती धीरज वाधवान व कपिल वाधवान येस बॅकेच्या आर्थिक घोटाळ्यातील संशयित असून सीबीआयच्या पथकाने महाबळेश्वर येथील त्यांच्या वाधवान हाउस या बंगल्यातून 23 एप्रिल रोजी ताब्यात घेतले. तेव्हापासून ते सीबीआय कोठडीत आहेत, सात मेपर्यंत त्यांना कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, बुधवारी त्यांच्यावरील आरोपांच्या तपासासाठी सीबीआयच्या विशेष तपास पथकाने महाबळेश्वर येथील त्यांच्या बंगल्यावर हजेरी लावली.
सीबीआयच्या दोन विशेष वाहनांतून त्यांना दुपारी येथे आणण्यात आले. येथे येण्यापूर्वी येथील स्थानिक पोलिसांना कळविण्यात आले होते. सीबीआयच्या सूचनेनुसार दुपारी बारा वाजता स्थानिक पोलिसांचे पथक वेण्णा लेक येथे पोहचले. तेथून सीबीआयच्या पथकाबरोबर सर्व येथील वाधवान हाउसमध्ये पोहचले. तेथे स्थानिक पोलिसांना बाहेर काढून सीबीआयच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक व त्यांच्या पथकाने तब्बल पाच तास तपास केला.
या वेळी बंगल्याची झाडाझडती घेऊन तेथील कागदपत्रांची पाहणी केली. याप्रकरणी पुन्हा वाधवान बंधुंचे जबाब नोंदविण्यात आले. सायंकाळी पाच वाजता वाधवान बंधुंना घेऊन सीबीआयच्या पथकाने येथील स्थानिक पोलिस ठाण्यात हजेरी लावली. येथील सोपस्कार पूर्ण करून साडेपाच वाजता सीबीआयच्या विशेष तपास पथकाने मुंबईकडे कूच केले. लोणावळा येथे एका खासगी बंगल्यात असताना अचानक आठ मार्च रोजी वाधवान कुटुंब महाबळेश्वरला आले. तेव्हापासून ते सीबीआयच्या रडारवर आले. येथील स्थानिक पोलिसांनीदेखील वाधवान यांच्यावर काही गुन्हे दाखल केले आहेत.
महाबळेश्वर येथे आल्यानंतर वाधवान कुटुंबाला प्रथम जिल्हा प्रशासनाने संस्था क्वारंटाइन केले. त्यानंतर पुन्हा 14 दिवस होम क्वारंटाइन करण्यात आले. होम क्वारंटाइनचा कालावधी संपुष्टात येण्यापूर्वीच सीबीआयच्या पथकाने येस बॅक घोटाळा प्रकरणी धीरज वाधवान व कपील वाधवान यांना चौकशीसाठी ताब्यात घेत अटक करून मुंबईला नेले. तेव्हापासून वाधवान बंधू सीबीआयच्या कोठडीत आहेत. वाधवान बंधुंची कोठडी सात मे रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे उद्या वाधवान यांच्या कोठडीत वाढ होणार की त्यांना न्यायालयीन कोठडी मिळणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, उदया त्यांना पोलिस कोठडी वाढवून मिळाली नाही तरी त्यांना तातडीने जामीन मिळेल याची शक्यता कमीच आहे. सीबीआयनंतर कदाचित “ईडी’चे पथक वाधवान बंधुंना चौकशीसाठी ताब्यात घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वाधवान बंधुंना जामिनावार सुटण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे, अशी चर्चा सुरू होती.