सोलापूर – ज्ञानोबा, तुकाराम आदी संतांच्या काळातील म्हणजे 700 वर्षापूर्वीचे विठ्ठल मंदिर (Vitthal temple) कसे असेल याची सर्वांनाच उत्कंठा लागलेली आहे. आता या 73 कोटींच्या विकास आराखड्याच्या कामांना लवकरच सुरुवात होणार आहे. पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या टेंडर प्रक्रियेत मुंबई येथील विठ्ठल मंदिराच्या 73 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याचे काम सावनी हेरिटेज अँड कॉन्सर्व्हेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यातील 26 कोटी रुपयांच्या कामाची सुरुवात कार्तिकी यात्रेनंतर होण्याचे संकेत मंदिर प्रशासनाने दिले आहेत. पुरातत्व विभागाने दिलेल्या निविदेत आता ठेकेदार निश्चित झाल्याने पहिल्या टप्प्यात नेमकी कोणती कामे करायची यासाठी पुरातत्व विभाग, मंदिर समिती आणि ठेकेदार यांची एक बैठक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद घेणार आहेत. त्यानंतर या कामाला सुरुवात होईल, असे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.
नामदेव महाद्वार, दर्शन व्यवस्था, महालक्ष्मी मंदिरावरील स्लॅब, शनी मंदिराजवळील काम आणि मंदिरातील दगडी फ्लोरिंग या कामाला पहिल्या टप्प्यात सुरुवात होण्याची शक्यता आहे. विठ्ठल आणि रुक्मिणी गाभाऱ्यात लावलेले ग्रॅनाईट आणि मार्बल हटवून पूर्वीच्या मूळ दगडी भिंती पुन्हा भाविकांना पाहता येणार आहेत. याशिवाय संपूर्ण मंदिराचे फ्लोरिंग हे मूळ दगडी केले जाणार आहे.
संत ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्या काळात ज्या पद्धतीने विठ्ठल मंदिराचे स्वरूप होते त्याच पद्धतीने आता भाविकांना पाहायला मिळणार आहे. देशातील पुरातन मंदिराप्रमाणे विठ्ठल मंदिराला 700 वर्षापूर्वीचे रूप मिळणार असल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. राज्य सरकार यासाठी प्रयत्न करत असून यासाठी पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाने हा विकास आराखडा तयार केल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या आराखड्याची विशेष परिश्रम घेतल्याने पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली 73 कोटी 80 लाख रुपयाचा आराखडा मंजूर करण्यात आला होता. तोच आराखडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू करण्यास निधीची तरतूद केल्याने आता विठ्ठलभक्ताना विठ्ठल मंदिराचे 700 वर्षापूर्वीचे रूप येत्या काळात पाहायला मिळणार आहे.