पुणतांबा – येथील पूरग्रस्त भागाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी भेट देऊन पूरस्थितीचा आढावा घेतला. पूरग्रस्तांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करून नुकसान झालेल्या पिकांचे व घरांचे पंचनामे करण्याचे आदेश अध्यक्ष विखेंनी तहसीलदार माणिक आहेर यांना दिले. सोमवारी कोपरगाव, शिर्डी, डोणगाव या तिन्ही रस्त्यावरील वाहतूक पुरामुळे बंद राहिली. पुराचे पाणी बाजार तळात गावाच्या काही भागात शिरले. बाजार तळ्यात पाणी असल्यामुळे सोमवारचा आठवडे बाजार जिल्हा परिषद शाळेसमोर भरवण्यात आला.
गोदावरी पुराच्या पाण्यामुळे नदीकाठावरील मंदिरे पाण्याखाली गेली असून वसंत बंधारे होऊन पुराचे पाणी पडत असल्यामुळे पुणतांबा, डोणगाव संपर्क तुटला आहे. पुराच्या पाण्यामुळे कोपरगाव शिर्डी या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. रस्तापूर मधील शंभर पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या नागरिकांना आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या वतीने जेवणाची व पिण्याची पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वैद्यकीय सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवारी सकाळी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे यांनी रस्तापूर पूरग्रस्तला भेट देऊन पाहणी केली. पूरग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले.
अध्यक्ष विखे यांच्यासमवेत जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, तहसीलदार माणिक आहेर, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, सरपंच डॉ. धनंजय धनवटे, विजय धनवटे आदी उपस्थित होते. इंदिरानगर भागात पुराचे पाणी शिरल्यामुळे तेथील नागरिकांचे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीची पाहणी देखील अध्यक्ष विखे यांनी केली. पुराचे पाणी गावातील कार गल्लीमध्ये शिरल्यामुळे इंदिरानगर व तेथील नागरिकांची व्यवस्था जिल्हा परिषद शाळेमध्ये करण्यात आली होती. पुणतांबातील पूरग्रस्त बाबत नागरिकांना मदत मिळवून देण्यासाठी सरपंच डॉ. धनंजय धनवटे प्रयत्नशील होते.
पुराचे पाणी शेतकऱ्यांचे उभ्या पिकात गेल्यामुळे सोयाबीन, मका या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पुणतांबेतील पुरग्रस्ताची पाहणी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी रस्तापूर भागाला भेट देऊन पूरग्रस्तांना आधार दिला. पूरग्रस्तांना संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे. गोदावरी पुरामुळे शेतकऱ्यांचे नागरिकांचे नुकसान झाले आहे, त्या नुकसानाची भरपाई मिळवून देण्यासाठी आमदार स्नेहलता कोल्हे प्रयत्नशील असल्याचे विवेक कोल्हे यांनी सांगितले.
पुणतांबातील गोदावरीचे पाणी पाण्यासाठी तालुक्यातील परिसरातील पर्यटकांनी गर्दी केली होती. वसन बंधाऱ्यावरून पाणी पडत असल्याचे अनोखे दृश्य व पुराचे पाण्याचे अथांग दृश्य अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये शूटिंग करून घेतले. पुणतांबा येथील पुराचे पाणी बघण्यासाठी लहान मुलासह ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. सायंकाळनंतर धरण क्षेत्रातील पाण्याचा विसर्ग कमी झाल्याचे समजते. त्यामुळे पुणतांबेतील पूरस्थिती मंगळवारी दुपारनंतर पूर्वपदावर येईल असा अंदाज आहे.