सातारा -“बेटी बचाव बेटी पढाव’, “पाणी वाचवा जीवन वाचवा’, “प्लॅस्टिकमुक्तीचा फायदा’ असा संदेश देत भारतभ्रमणासाठी निघालेले वाठार किरोलीचे विकास शिंदे करोनाच्या लॉकडाऊनमुळे आसाममध्ये अडकले आहेत. आसाममधील मॉरीगाव जिल्हा पोलीस अधीक्षक स्वप्निल डेका यांनी महाराष्ट्राच्या या पाहुण्यांचा तब्बल 62 दिवस यथोचित पाहुणचार करून शिंदे यांच्या घरवापसीची तयारी केली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ते परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत.
विकास जगन्नाथ शिंदे यांना प्रेरणादायी संदेश देत भारत भ्रमण करण्याचे वेड आहे. आजपर्यंत दुचाकीवर सुमारे तीन लाख 37 हजार किलोमीटर प्रवास करून पाच वेळा त्यांनी भारत भ्रमण केले आहे. दि.18 फेब्रुवारीला सहाव्यांदा भारत भ्रमण करण्यासाठी वाठार किरोली (ता.कोरेगाव) येथून आपल्या दुचाकीवरून विकास शिंदे यांनी ‘एकला चलो रे..’ म्हणत प्रारंभ केला. विविध संदेश देत प्रवास सुरू असतानाच आसाममधील धेमाजी जिल्ह्यात पोहचले असताना करोनामुळे पुढील प्रवास करण्यास त्यांना मज्जाव करण्यात आला. या गंभीर परिस्थितीमध्ये पुढील प्रवास करणे किंवा गावी परतणे अशक्य होते. काय करावे, या प्रश्नाने शिंदे यांच्या डोक्यात काहूर माजले होते.
माहिती घेतली असता लातूर जिल्ह्यातील नरसिंग पवार तेथील जिल्हाधिकारी व फलटण तालुक्यातील कुरोली (माळीवाडी) गावचे धनंजय घनवट तेथील जिल्हा पोलीस अधीक्षक असल्याचे त्यांना समजले. त्यांनी तात्काळ दोन्ही अधिकाऱ्यांची भेट घेतली. दोन्ही अधिकाऱ्यांनी आर्थिक मदत करून धनंजय घनवट यांनी मॉरीगावच्या जिल्हा पोलीस अधीक्षक स्वप्नील डेका यांना भेटण्यास सांगितले. स्वप्नील डेका यांची विकास शिंदे यांनी भेट घेतली असता त्यांनी विचारपूस करून पोलीस विश्रामगृहात राहण्यासह खाण्यापिण्याची सोय केली. तब्बल 62 दिवस या ठिकाणी मुक्कामास असताना स्वप्नील डेका, उपअधीक्षक लुईथ तालुकरार व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिंदे यांना सर्वोतपरी सहकार्य केले. खासदार श्रीनिवास पाटील यांना माहिती मिळताच त्यांनीही धनंजय घनवट यांना फोन करून शिंदे यांना केलेल्या मदतीबद्दल आभार मानले.
विकास शिंदे यांना आर्थिक मदतही केली. भारत भ्रमणसाठी मार्गदर्शन करणारे दीपक भुजबळ व गावातील अनेक मित्रांनी आर्थिक मदत केली असल्याचे विकास शिंदे यांनी सांगितले. मे महिन्यात शेवटच्या आठवड्यात मेडिकल चेकअप करून महाराष्ट्रात येण्यासाठी आसाममधून रवाना होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लॉकडाऊनमुळे कुटुंबीयांची ताटातूट
लॉकडाऊनमुळे विकास शिंदे आसाममध्ये अडकले. तर मुलगा मुंबई व पत्नी वाठार किरोलीमध्ये राहिली. करोनामुळे शिंदे यांचे कुटुंबच विखुरलेल्या ठिकाणी होते. परंतु, काही दिवसांपूर्वीच मुंबई येथील त्यांचा मुलगा गावी परतला आहे. विकास शिंदेचाही गावी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच कुटुंब पुन्हा एकत्र येईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.