नवी दिल्ली – “सीबीएसई’च्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेली प्रकरणांबाबत चुकीच्या धारणा प्रस्तुत करण्याच्या हेतूने “अज्ञात भाष्य’ केले जात असल्याची टिप्पणी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी केली आहे. करोनाच्य साथीच्या पार्श्वभुमीवर “सीबीएसई’चा अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे. मात्र जी प्रकरणे परीक्षेच्या दृष्टीने वगळण्यात गेली आहेत, त्यावर विरोधकांकडून टीका केली जाऊ लागली आहे. केवळ एकाच विचारधारेचा पाठपुरावा करण्याच्या हेतूने लोकशाही आणि बहुविधतेशी संबंधित प्रकरणे वगळण्यात आली आहेत, असा आक्षेप विरोधकांकडून घेतला जाऊ लागला आहे.
जी प्रकरणे वगळली गेली आहेत, त्याबाबत अज्ञात भाष्य केले जाऊ लागले आहे. अशी टीका करणाऱ्यांना चुकीच्या धारणा पसरवण्यासाठी सनसनाटीपणा हवा असतो. राष्ट्रवाद, स्थानिक स्वराज्य संस्था, संघराज्य इत्यादी तीन ते चार प्रकरणांना वगळण्यातून चुकीचा निष्कर्श काढणे सोपे असते आणि बनावट भाष्य करता येऊ शकते. मात्र वेगवेगळ्या विषयांचा व्यापक परामर्श घेताना अशी प्रकरणे वगळावी लागतात, असे निशंक ट्विटमध्ये म्हणाले.
अशाप्रकारे अभ्यासक्रम कमी करण्याची वेळ करोनाच्या पार्श्वभुमीवर एकदाच आलेली आहे. “एनसीईआरटी’च्या शैक्षणिक वेळापत्रकाचा अवलंब करावा आणि नमूद केलेली प्रकरणे शिकवली जावीत. वगळली गेलेली प्रकरणे केवळ परीक्षेतून वगळलेली आहेत, हे “सीबीएसई’ला आगोदरच स्पष्ट करून सांगण्यात आलेले आहे, असेही निशंक यांनी स्पष्ट केले आहे.