श्रीकांत कात्रे
आर्थिक परिस्थिती सावरण्यासाठी विजया भोसले यांनी केलेली धडपड इतरांसाठी अनुकरणीय ठरली आहे. काम शोधता शोधता स्वतःच व्यवसाय करण्याची दृष्टी त्यांनी शोधली. त्याच धडपडीतून शिकत शिकत विविध फळांच्या आणि भाजीपाल्यांच्या पावडरी तयार करण्याचा उद्योग त्यांनी सुरू केला. ही धडपड त्यांच्या एकटीपुरती नव्हती. आपल्याबरोबर इतर महिलाही स्वतःच पायावर उभ्या राहाव्यात ही जाणीव मनात ठेवून त्यांनी अनेक महिलांना व्यावसायिक बनविले. ग्रामीण भागातील महिला विचारपूर्वक कृती करून स्वतःसह अनेकांना यशाचा मार्ग दाखवते, ही बाब निश्चितच प्रेरक आहे.
गरज ही शोधाची जननी असते, असे म्हणतात. काही काम करून आर्थिक स्थैर्य मिळविण्यासाठी धडपड करणाऱ्या विजया भोसले यांनी विविध फळे व भाज्यांची पावडर तयार करण्याचा उद्योग जिद्दीने यशस्वी केला. ग्रामीण भागातील महिला नियोजनबद्ध प्रयत्न करते, कष्टपूर्वक स्वतःचा उद्योग सुरू करते, स्वतःसह इतर महिलांना आर्थिक स्वावलंबी बनविते हे काम सोपे नाही. परंतु, मेहनत घेत विजया भोसले यांनी स्वतःला सिद्ध केले. स्वतःची ओळख निर्माण केली. शिवाजीनगर (ता. खंडाळा) येथे राहणाऱ्या विजया भोसले यांना तिथे काहीच काम मिळेना, तेव्हा त्यांनी माहेरजवळील जेजुरी गाठली.
जेजुरीला औद्योगिक वसाहत असल्यामुळे काही काम मिळेल, या अपेक्षेने त्यांनी जेजुरीत खोली घेतली. कामाचा शोध सुरू केला. परिसरातील अशिक्षित महिलांची त्यांची ओळख झाली. त्यांनाही कामाची गरज होती. काम शोधताना औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीसमोर गाड्यांतून आंबे उतरवत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी तिथे जाऊन कामाची चौकशी केली. कामाला माणसे नसल्यामुळे आंबे नासू लागले होते. त्यामुळे कंपनीने त्यांना कामाला बोलवलेच पण इतर महिलांनाही बोलवावे, असे त्यांना सुचविले.
मग इच्छुक असणाऱ्या सर्व महिलांना त्यांनी काम उपलब्ध करून दिले. काम सुरू केले. परंतु, विजयाताईंना तेथील वासाचा त्रास होऊ लागल्याने त्या कामाला गेल्या नाहीत. कंपनीची माणसे त्यांना शोधत घरी आली. तेव्हा तुम्हाला त्रास होत असेल तर येऊ नका मात्र कामासाठी महिला पुरवा, अशी ऑफर कंपनीने त्यांना दिली. त्या महिलांकडून काम करून घेण्यासाठी त्यांना पाच टक्के कमिशन मिळू लागले. त्या हंगामात 100 ते 150 महिलांना त्यांनी काम उपलब्ध करून दिले. त्यांच्या या कामाची माहिती इतरत्र समजू लागली. समोसा, चपात्या, भाज्या तयार करणाऱ्या कंपनीला महिलांची गरज भासू लागली, त्यावेळी त्यांनी विजया भोसले यांच्याशी संपर्क साधला. त्या कंपनीलाही त्यांनी वीस महिला उपलब्ध करून दिल्या. रात्री 5 ते 10 ची रात्रपाळी व दिवस पाळी अशा दोन पाळ्यांमध्ये महिलांना काम मिळाले.
कंपनीने गावात नेण्या आणण्यासाठी गाडी दिली. त्यामुळे महिलांमध्ये सुरक्षिततेच्या भावनेसह आत्मविश्वास निर्माण झाला. कंपनीचे भाजीपाला कटिंग करण्याचे काम वाढले. त्यासाठी विजयाताईंनी गावात सेंटर सुरू केले. कंपनीची गाडी तिथे येऊन भाजीपाला पोहचवायची. महिलांनी कटिंग केलेली भाजी परत घेऊन जायची. या सेंटरमध्येही महिलांना घरगुती स्वरूपात काम मिळाले. याच काळात त्यांचा माणदेशी फाउंडेशनशी संपर्क आला. त्या माध्यमातून महिलांना विविध व्यवसायांचे एक दिवसाचे प्रशिक्षण दिले.
आता सर्वांना आर्थिक स्थिरता मिळेल, असे वाटत असतानाच लॉकडाऊनचे संकट उभे ठकले. कंपन्या बंद पडल्या. विजयाताईंसह सर्वांपुढे प्रश्नचिन्ह उभे राहिले. त्यांच्याबरोबरच्या इतर महिलांनीही विविध प्रकाराचे प्रशिक्षण घेतले होते. त्यांनीही वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय सुरू केले. काही महिलांना त्यांनी राख्या बनविण्याचे काम शिकविले. विजयाताईंनी इंटरनेटवर शोध सुरू केला. त्यावेळी विविध फळे आणि भाज्यांची पावडर तयार करण्याचे प्रशिक्षण देणारा ऑनलाइन क्लास मिळाला. या क्लासमध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतले. फळांची आणि भाज्यांची पावडर तयार करण्याचे काम त्यांनी सुरू केले.
माणदेशीने मार्केटिंगसाठी तसेच हिशोब ठेवण्यासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले. भांडवलासाठी माणदेशी फौंडेशनकडून पाच हजार रुपयांचे बिनव्याजी कर्ज तीन महिन्यांसाठी उपलब्ध झाले. पालक, कडीपत्ता, उकडलेले अंडे, कांदा, टोमॅटो, हळद, केळीची पावडर, आवळा, शेवग्याच्या पाल्याची पावडर, लसूण पावडर अशा पावडरी त्या तयार करू लागल्या. गाजर किसून ते कोरडे करायचे गरम पाण्यात टाकले की गाजराचा हलवा तयार, पुरणपोळीसाठी कोरडे पुरण तयार करायचे गरम पाण्यात घातले की पुरण तयार असे इन्स्टंट फंडे त्यांनी सुरू केले. वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक पावडर त्या तयार करू लागल्या.
पावडर तयार करण्यासाठी 15 हजारांची गिरणी घेतली. पावडर सुकवायला दोन तीन महिलांना काम दिले. कच्चा माल शेतकऱ्यांकडून मिळवायचा. व्हॉटसऍपच्या स्टेटसद्वारे विक्रीसाठी पार्लर, हॉटेल, मेडिकल, दुकानांशी संपर्क साधून प्रयत्न सुरू केले. आता पावडरची मागणी वाढली आहे. पुण्यातील एका कंपनीने मोठी ऑर्डर दिली आहे. सध्या मागणीनुसार एक ते पाच किलोपर्यंत विविध पावडरी त्या तयार करतात. पावडर तयार करण्यासाठी आता त्यांना 40 हजार रुपये किमतीचा ड्रायर घ्यायचा आहे. सध्या त्या पाऊचमधून पावडर विक्री करतात. आता लेबलिंग, पॅकेजिंग करून त्यांना व्यवसाय वाढवायचा आहे. याबरोबरच शेवया तयार करून विकणे, माणदेशीच्या इतर महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांची विक्री करणे त्यांनी सुरू ठेवले आहे. हे सर्व व्याप सांभाळताना बी. एस्सी. पर्यंत शिक्षण घेऊन लॅबमध्ये नोकरी करणाऱ्या मुलीची मदत त्यांना होते. खेडेगावातील महिला स्वतःच्या पायावर समर्थपणे उभी राहते. इतर महिलांना आर्थिक स्वावलंबी बनविते, असे शिवधनुष्य पेलणाऱ्या विजयाताईंचे काम आदर्शवत असेच आहे.