भंडारा – मुख्यमंत्र्यांनी देश, विदेश, राज्य फिरले पाहिजे. मात्र राज्याची परिस्थिती लक्षात घेऊन फिरले पाहिजे. राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. मराठवाड्यात दररोज तीन शेतकरी आत्महत्या करीत आहेत. राज्यात मराठा, ओबीसी समाजाचा उद्रेक होत असताना त्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. 370 कलम हटविल्यानंतर मुख्यमंत्र्यांना काश्मीर आवडत असेल तर खुशाल जावे. त्या आधी ओबीसी समाजाचे उपोषण सोडवून जावे, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार केली.
मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात समाविष्ट करू नये, या मागणीसाठी चंद्रपुरात सुरू असलेल्या आंदोलनाला रविवारी वडेट्टीवार यांनी भेट दिली. यासाठी रवींद्र टोंगे हे मागील सोमवारपासून अन्नत्याग आंदोलन करीत आहेत. याप्रसंगी आयोजित ओबीसी मोर्चातही त्यांनी सहभाग नोंदविला. सोबत भाजप नेते आशीष देशमुख उपस्थित होते. आठ दिवस उलटूनही या आंदोलनाची दखल न घेतल्याने ओबीसी बांधवांत असंतोष असून, हा लढा आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
…तर भिडेंना जेलमध्ये टाकू
कॉंग्रेस पक्ष तथा महात्मा गांधी व देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या नेत्यांबद्दल भिडे अतिशय खालच्या पातळीवर बोलून तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत. राज्यात कॉंग्रेस पक्षाची सत्ता आली तर वादग्रस्त वक्तव्य करणारे संभाजी भिडे या समाजात वळवळ करणाऱ्या किड्याला जेलमध्ये टाकून चक्की पिसिंग-पिसिंग करायला लावणार, असे वक्तव्य वडेट्टीवार यांनी यावेळी केले.