नवी दिल्ली – प्रदेश कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्यातील मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ओबीसींसाठी स्वतंत्र आघाडी स्थापन करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. ओबीसींच्या समस्या प्रभावीपणे मांडण्यासाठी आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी ही आघाडी कार्य करील असे त्यांनी म्हटले आहे.
त्यांनी आज पीटीआयशी बोलताना सांग्तितले की ओबीसी समाजाचे अनेक नेते मला गेल्या काही दिवसांत भेटले आहेत. त्यांनी ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी अशी स्वतंत्र आघाडी स्थापन करण्याची गरज व्यक्त केली.
त्यानुसार आपण उद्या बुधवारी मुंबईत ओबीसी समाजाच्या नेत्यांची बैठक बोलावली असून त्यात या आघाडीच्या संबंधात विचारविनीमय केला जाईल तसेच औरंगाबादला ओबीसी समाजाचे मोठे शक्तीप्रदर्शनही आयोजित केले जाणार आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत हा मेळावा घेतला जाणार आहे असे ते म्हणाले.