पुणे: पुण्यातील औंध गावात देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंदिराची उभारणी करण्यात आली होती. या गावात मोदींचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला. आता या मंदिरातून मोदींचा पुतळा रातोरात हटवण्यात आल्याची माहिती सकाळी समोर आली.
पुणे येथील औंध गावातील भाजप कार्यकर्ते आणि नमो प्रतिष्ठानचे अध्यक्ष मयूर मुंडे यांनी औंध भागातील परिहार चौकात मोदी मंदिराची उभारणी केली होती. या मंदिरासाठी त्यांनी १ लाख ६० हजार रुपयांचा खर्च केला होता. पिंपरी-चिंचवड येथील व्यावसायिक दिवांशू तिवारी यांच्या मार्फत जयपूर येथून मोदी यांचा अर्धपुतळा तयार करून आणण्यात आला होता. मात्र आता मोदींचा पुतळा भाजप कार्यालयात हलवण्यात आल्याचं समजतं. पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आदेशानंतर ही मूर्ती हटवण्यात आली आहे.
यातच याबाबत सविस्तर माहिती मिळताच पुण्यतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मंदिराजवळ येऊन देशातील महागाईच्या मुद्यावरून आंदोलन सुरु केले. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणाले, ‘भाजपचा BJPदेव काही केल्या आम्हाला दिसत नाहीए. पेट्रोल, डिझेल, सिलिंडरचे दर कमी होऊ दे, यासाठी नवस बोलायला आम्ही इथे आलो, तसेच “आता तरी मोदी देवा पावणार का? महागाई कमी करणार का? भक्तांच्या मदतीला धावणार का..?” असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. देव चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.