लोणी धामणी -तालुक्याच्या पूर्वभागातील लोणी, धामणी, वडगावपीर, मांदळेवाडी, पहाडदारा, परिसरात काल झालेल्या जोरदार पावसाने उभी असलेली बाजरी, कडवळ, व इतर तरकारी पिके भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.
या परिसरात गेल्या दोन-तीन महिन्यांपासून पावसाची प्रतीक्षा होती नुकत्याच पावसाच्या दमदार हजेरीने एका बाजूला बळीराजा सुखावला असला तरी दुसऱ्या बाजूला पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत आहे. तालुक्यातील हा परिसर नेहमीच दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जात असून, येथील शेती पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे.
या भागात खरिपातील बाजरी, भुईमूग, बटाटा पिके हातातोंडाशी आली असून काही ठिकाणी बाजरी काढणीची कामे सुरू आहेत. अचानकपणे झालेल्या पावसाने शेतातील उभी पिके भुईसपाट झाली आहेत. त्यामुळे कृषी विभागाने या परिसरातील शेतीचे त्वरीत पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी सरपंच सागर जाधव यांनी केली आहे.
या परिसरात जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. झालेल्या पावसाने तीस टक्केच पाणीसाठा झाला असून परिसरातील सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्यावर विहिरींची पाणी पातळी वाढू शकेल. शेततळी भरली तरच दुष्काळ हटणार आहे, अजूनही पावसाची आवश्यकता आहे. पाऊस झाला नाही तर रब्बी हंगाम धोक्यात येईल व काही दिवसातच पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा टॅंकर सुरू करावे लागतील.
-रवींद्र करंजखेले, पंचायत समिती सदस्य आंबेगाव