रिर्झव्ह बॅंकेने रेपो दरात अपेक्षेपेक्षा जास्त कपात केल्याचा परिणाम
मुंबई- सर्व विश्लेषकांच्या अंदाजापेक्षा जास्त रेपो दर कपात रिर्झव्ह बॅंकेने जाहीर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. रिर्झव्ह बॅंकेने रेपो दरात 0.75 टक्क्यांची घसघशीत कपात केल्यामुळे त्याप्रमाणात व्यवसायिक बॅंका ग्राहकांना दिल्या जात असलेल्या कर्जावरील व्याजदरात कपात करणे गृहीत धरले जात आहे.
रेपो दरावर रिर्झव्ह बॅंक व्यावसायिक बॅंकांना लघु पल्ल्याचे कर्ज देत असते. व्यावसायिक बॅंकांना रिर्झव्ह बॅंकेकडून मिळणारे भांडवल स्वस्त झाल्यानंतर व्यावसायिक बॅंकाही ग्राहकांना स्वस्त भांडवलाचा पुरवठा करीत असतात. रिर्झव्ह बॅंकेने रेपो दरात 0.75 टक्क्यांची कपात केल्यामुळे बॅंकाही त्या प्रमाणात ग्राहकांना दिल्या जात असलेल्या कर्जावरील व्याजदरात कपात करतील. यामध्ये वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज, घरासाठीचे कर्ज आणि इतर सर्व कर्जांचा समावेश असतो.
पतधोरण जाहीर करताना रिर्झव्ह बॅंकेने व्यावसायिक बॅंकांनीही कर्जावरील व्याजदरात शक्य तितक्या लवकर कपात करावी अशी सूचना केली आहे. मंदी आणि करोना व्हायरसमुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी नागरिकांनी भांडवलाचा जास्तीत जास्त वापर करावा अशी भूमिका रिर्झव्ह बॅंकेचे आहे. यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
रिर्झव्ह बॅंकेच्या या निर्णयाचे अर्थातच नागरिकांनी, बॅंकांनी आणि उद्योजकांनी स्वागत केले आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये रिर्झव्ह बॅंकेने नागरिकांना आणि उद्योगांना एक पाऊल पुढे येऊन अपेक्षेपेक्षा व्याजदरात जास्त कपात केली आहे, असे उद्योजकांनी सांगितले. यामुळे परिस्थिती बरीच सुधारण्याची शक्यता आहे. रिर्झव्ह बॅंकेने व्याजदरात कपात करूनही आगामी काळातही आणखी कपात करण्याची शक्यता खुली ठेवली आहे. काही विश्लेषकांनी सांगितले की यामुळे महागाई थोडी-फार वाढण्याची शक्यता आहे. असे असले तरी सध्याच्या परिस्थितीचा विचार करून ऑगस्ट महिन्यापर्यंत रिर्झव्ह बॅंक आणखी व्याजदरात कपात करण्याची शक्यता असल्याचे विश्लेषकांना वाटते.
पंतप्रधानांकडून स्वागत
रिर्झव्ह बॅंकेने व्याजदरात मोठी कपात जाहीर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॅंकेच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. सध्याच्या काळात व्याजदर कपातीमुळे मध्यमवर्गीयांना आणि उद्योजकांना मदत मिळणार आहे. आगामी काळातही अर्थव्यवस्था लवकर रुळावर यावी याकरिता रिर्झव्ह बॅंक आणि केंद्र सरकार समन्वयाने प्रयत्न करणार असल्याचे मोदी यांनी सूचित केले.