मुंबई – महागाईबाबत ओरड चालू असतानाच मार्च महिन्यात देशात विविध शहरातील उपहारगृहात मिळणार्या शाकाहारी थाळीच्या किमतीत सात टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. मार्च महिन्यामध्ये कांदे, टोमॅटो आणि बटाट्याच्या किमतीत वाढ झाल्यामुळे उपाहारगृहचालकांना शाकाहारी थाळीच्या दरात वाढ करावी लागली असल्याचे दिसून येते. (Vegetarian food is expensive)
क्रिसिल या संस्थेने देशातील काही शहरातील आकडेवारीचा अभ्यास करून ही माहिती जारी केली आहे. विशेष म्हणजे मार्च महिन्यामध्ये मांसाहारी थाळीच्या दरात मात्र सात टक्क्यांनी घट झाली आहे. कारण पोल्ट्रीचे दर मार्च महिन्यामध्ये कमी झाल्यामुळे उपहारगृह चालकांनी मांसाहारी थाळीच्या दरात सात टक्क्यांनी घट केली आहे.
या संस्थेने जारी केलेल्या माहितीनुसार देशभरातील किमतीनुसार मार्च महिन्यात शाकाहारी थाळीचा दर सर्वसाधारणपणे 27.30 रुपये प्रति थाळी होता. गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये हा दर 25.50 रुपये प्रति थाळी होता. शाकाहारी थाळीमध्ये रोटी, भाजी, भात, डाळ, सलाड आणि दह्याचा समावेश असतो. फेब्रुवारी महिन्यात मात्र शाकाहारी थाळीचा दर सर्वसाधारणपणे 27.4 रुपये प्रति थाळी असा होता.
मार्च महिन्यामध्ये कांद्याच्या किमती 40 टक्क्यांनी, बटाट्याच्या किमती 36 टक्क्यांनी, तर टोमॅटोच्या किमती 22 टक्क्यांनी वाढल्या. त्यामुळे एकूणच थाळीच्या दरामध्ये वाढ झाली आहे. त्याचबरोबर तांदळाचे दर या महिन्यात 14 टक्क्यांनी तर डाळींचे दर 22% नी वाढले आहे. त्यामुळेही थाळीच्या दरात वाढ झाली आहे.
एकीकडे शाकाहारी थाळीच्या दरात वाढ झाली असतानाच मांसाहारी थाळीचा दर मार्च महिन्यात देशात सर्वसाधारणपणे 54.90 रुपये प्रति थाळी इतका होता. गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये हा दर 59.20 रुपये प्रति थाळी असा होता.
फेब्रुवारी महिन्यामध्ये मांसाहारी थाळीचा दर 54 रुपये होता. मांसाहारी थाळीमध्ये सर्वात साधारणपणे पोल्ट्रीचा समावेश केलेला असतो. इतर मांसाहारी पदार्थाचे दर यापेक्षा जास्त असतात. मार्च महिन्यामध्ये ब्रॉयलरचा दर 16 टक्क्यांनी कमी झाला आहे. उन्हाळ्यामध्ये ब्रॉलरचे दर कमी होतात. त्यामुळे उन्हाळ्यात सर्वसाधारणपणे मांसाहारी थाळीचा दर कमी होत असतो असे सांगितले जाते.