– माधव विद्वांस
‘केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा’ या गीतातील गोडव्याप्रमाणे अनेक भावगीते रचणारे रमेश अणावकर यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अणाव येथे सप्टेंबर 1932 रोजी झाला. त्यांनी लिहिलेली सुमारे 30 गाणी सुपरिचित आहेत. त्यात 4/5 चित्रपटगीते व बहुतेक भावगीत, भक्तिगीत प्रकारात येतात. त्यांच्या गीतांना दशरथ पुजारी, वसंत प्रभू, श्रीकांत ठाकरे यांनी संगीत दिले, तर सुमन कल्याणपूर, अशा भोसले, जयवंत कुलकर्णी यांनी आवाज दिला.
त्यांच्या गीत लेखनाचे अनेक किस्से आहेत. सुमन कल्याणपूर यांचे पती रामानंद कल्याणपूर हे गायक व संगीतकार नसले तरी त्यांना गाण्याची आवड व जाण होती. त्यांची कवी रमेश अणावकरांची ओळख होती. एकदा ते अणावकर यांना म्हणाले, ‘अणावकर, तुम्ही एखादं असं भक्तिगीत लिहा की जे उद्या प्रत्येकाच्या ओठांवर आपसुक आलं पाहिजे.’
योगायोगाने त्याच दिवशी दशरथ पुजारींनी एक गाणं करण्यासाठी अणावकर यांना बोलाविले.पुजारींनी त्यांना सुचलेल्या एक-दोन चाली हार्मोनियमवर ऐकवल्या. त्यातील एक चाल ऐकताना अणावकरांचे बदललेले भाव पुजारींच्या लक्षात आले. ते म्हणाले, ‘ही चाल तुम्हाला जरा जास्त आवडलेली दिसते, त्यावर अणावकरांनी गालातल्या गालात हसत मान डोलावली.’
मग या चालीवर काही शब्द सुचतात का पहा, अशी सूचना केली. या चालीत नेमके कोणते शब्द बसतील याचा ते विचार करत होते. त्यांना आपण सकाळी देवघरात करत असलेला पूजापाठ आठवला व त्यावेळी उच्चारत असलेला केशवायनम:माधवायनम: नारायणायनम: हे गोड शब्द आणि नाद आठवले. त्यांनी लागलीच पेन आणि कागद हातात घेतला आणि शब्द लिहिले ‘केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा’
अशाच एका प्रसंगातून आणखी एक सुंदर गीत जन्माला आले. दरवर्षी गणेशोत्सवात वसंत प्रभूंच्या घरी शास्त्रीय संगीताच्या मैफिली होत असत. त्यावेळी देशातील अनेक मोठे कलाकार या मैफलीमध्ये हजेरी लावत. अशाच एका मैफलीमध्ये उस्ताद अब्दुल रहमान खान साहेब यांनी कौशि कानडा हा दुर्मिळ राग सादर केला. मैफल संपली पण वसंत प्रभूंचे मनातून कौशि कानडाचे सूर काही जात नव्हते.
त्याच रात्री दोन वाजता ते शेजारी राहत असणार्या संगीतकार बाळ चावरे यांच्याकडे गेले आणि कौशि कानडा या रागाबद्दल बोलू लागले. लगेच बाळ चावरे यांनी हार्मोनियम काढला आणि हार्मोनियमवर ते कौशि कानडा रागाच्या सुरावटी वाजवू लागले. त्यातून एक सुंदर सुरावट जन्माला आली. अणावकर लिखित ‘नाम घेता तुझे गोविंद मनी वाहे भरुनी आनंद’ या गीताचा जन्म झाला.
मूळचे सिंधुदुर्गातील असल्यामुळे त्यांच्या काही गाण्यात मालवणी शब्द दिसतात. त्यांची लाजली सीता स्वयंवराला पाहुनी रघुनंदन सावळा मी मनात हसता प्रीत हसे हे गुपित कुणाला सांगू कसे? असा मी काय गुन्हा केला, मृदुल करांनी छेडित तारा अशी काही गाणी लोकप्रिय झाली. 30 जानेवारी 2004 रोजी त्यांचे निधन झाले.