सडपातळ शरीरयष्टी, बोलके डोळे, प्रसंगानुरूप बदलत जाणारा भावपूर्ण चेहरा असलेली लोकप्रिय अभिनेत्री नूतन यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 4 जून 1936 रोजी मुंबईत झाला. वडील दिग्दर्शक-कवी कुमारसेन समर्थ आणि आई शोभना समर्थ (माहेरच्या शिलोत्री) दोघेही चित्रपटसृष्टीशी संबंधित असल्याने त्यांच्यावर लहानपणापासूनच अभिनयाचे संस्कार झाले होते. त्या समर्थ कुटुंबात चार भावंडांमध्ये सगळ्यात मोठ्या होत्या. अभिनेत्री तनुजा ही त्यांचीच धाकटी बहीण. त्यांना दोन बहिणी व एक भाऊ होता. धाकटा भाऊ जयदीपच्या जन्माअगोदर काही दिवस तिचे आई-वडील विभक्त झाले होते. वडील कुमारसेन हे भारतातील चित्रपट विभागाच्या सुरुवातीच्या निर्माते दिग्दर्शकांपैकी एक होते. वर्ष 1945 मध्ये वडिलांच्या “नलदमयंती’ या चित्रपटात नूतन पहिल्यांदा लहानपणी कॅमेऱ्यासमोर आल्या.
नूतन यांचे प्राथमिक शिक्षण व्हिला थेरेसा शाळेत झाले. त्यानंतर त्यांचे शिक्षण बंगळुरूच्या बाल्डविन गर्ल्स हायस्कूलमध्ये झाले. त्यांना लहानपणापासूनच अभिनय, गायन आणि नृत्याची आवड होती. त्यांना अंकगणित आणि भूगोल हे विषय आवडत असत. काही काळासाठी त्यांना पुढील शिक्षणासाठी स्वित्झर्लंडला पाठवले होते. त्यांनी जगन्नाथ प्रसाद यांच्या हाताखाली चार वर्षे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. त्यांनी “तुझे कैसा दुल्हा भाये रे’ हे गाणे गाऊन चित्रपटासाठी स्नेहल भाटकर यांच्या साउंडट्रॅकमध्ये भाग घेतला होता. वर्ष 1950 मध्ये त्यांनी वयाच्या 14 व्या वर्षी आई शोभना समर्थ दिग्दर्शित “हमारी बेटी’ मध्ये भूमिका करून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी बिमल रॉय यांच्या दिग्दर्शनाखाली एक नैसर्गिक अभिनय शैली विकसित केली होती.
वर्ष 1951 मध्ये रवींद्र दवे दिग्दर्शित रहस्यमय नगीना हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यात नूतनच्या अभिनयानला खरी ओळख मिळाली. हा त्यांचा पहिला व्यावसायिक चित्रपट होता. त्यावेळी त्या 15 वर्षांच्या होत्या. त्यामुळे पहिल्या प्रीमियर शोसाठी सिनेमा “फक्त प्रौढांसाठी’ असल्याने त्यांना उपस्थित राहता आले नाही. वर्ष 1952च्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेत त्यांना मिस इंडिया मुकुट मिळाला. त्यांचा पहिला मोठा ब्रेक होता “सीमा’. यासाठी त्यांना पहिला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. त्यांच्या या यशानंतर देव आनंदबरोबर पेइंग गेस्ट, राजकपूर बरोबर अनाडी आणि सुनील दत्तबरोबर सुजाता या चित्रपटांमध्ये काम केले. 1960 व 1970च्या दशकात त्यांचे छलिया, सरस्वतीचंद्र, देवी, मैं तुलसी तेरे आंगन की यासह 70 हून अधिक चित्रपट यशस्वी झाले. त्यांचा विवाह नौदल लेफ्टनंट-कमांडर रजनीश बहल यांच्याशी झाला होता. चित्रपट आणि टेलिव्हिजन अभिनेता मोहनीश बहल हा त्यांचा मुलगा आहे.
त्यांनी दूरदर्शन टीव्ही मालिका मुजरिम हाजीरमध्ये कालीगंज की बहू म्हणून उत्कृष्ट अभिनय केला. ही त्यांची छोट्या पडद्यावरची एकमेव भूमिका होती. 1980 च्या दशकात त्यांनी चरित्र अभिनेत्रींच्या भूमिका स्वीकारण्यास सुरुवात केली. साजन की सहेली, मेरी जंग आणि नाम यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्यतः आईच्या भूमिका साकारल्या. मेरी जंगमधील
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून त्यांना सहावा आणि शेवटचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. साधना आणि स्मिता पाटील सारख्या अभिनेत्री नूतनला आपला आदर्श समजत होत्या. 21 फेब्रुवारी 1991 रोजी कर्करोगाने त्यांचे निधन झाले. त्यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने त्यांचा फोटो असलेले पोस्टाचे तिकीट प्रसिद्ध केले.
माधव विद्वांस
विविधा