नवी दिल्ली – करोना महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जगात अनेक जणांचे प्राण गेले. हा आकडा कोटींच्या घरात गेला आहे. भारतातही अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर लसीकरणाची मोहीम सुरू झाली. या लसीकरणामुळेच लाखो लोकांचे प्राण वाचले असल्याची माहिती आता विज्ञान विषयक एका नियतकालीकाने दिली आहे.
लॅन्सेटने 185 देश आणि तेथे करोनामुळे झालेल्या मृत्यूच्या आकडेवारीच्या आधारावर एक निष्कर्ष मांडला आहे. त्यानुसार करोनावर लसीचा शोध लागल्यानंतर देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू झाले अन त्याचमुळे कोट्यवधी लोकांचे प्राण वाचले. ही आकडेवारी 2020-21 ची आहे. लॅन्सेटच्या म्हणण्यानुसार भारतात अजुन 42 लाख जणांचा मृत्यू होऊ शकला असता. मात्र केवळ लसीकरणामुळे ते होऊ शकले नाही.
जागतिक आरोग्य संघटनेने जे लक्ष्य निर्धारीत केले होते ते साधले गेले असते तर आणखी 5 लाख 99 हजार 300 जणांना वाचवता आले असते, असेही हा अहवाल सांगतो. आरोग्य संघटनेने डिसेंबर 2021 पर्यंत प्रत्येक देशातील 40 टक्के लोकसंख्येला दोन किंवा त्यापेक्षा अधिक डोस दिले गेले पाहिजेत असे लक्ष्य निर्धारीत केले होते. मात्र ते साध्य होऊ शकले नाही. ते जर झाले असते तर बऱ्याच जणांचे प्राण आपण वाचवू शकलो असतो, असा दावा करण्यात आला आहे.