सीतामढी, दि. 13 – कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय भारतीय हद्दीत घुसलेल्या दोन चिनी नागरिकांना बिहारच्या सीतामढी जिल्ह्यात अटक करण्यात आली आहे. हे नागरिक पंधरा दिवसाहून अधिक काळ राजधानी दिल्लीच्या परिसरात राहात होते. ते बिहारमार्गे नेपाळला जाताना त्यांना अटक करण्यात आली आहे.
सशस्त्र सीमा दलाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रविवारी अटक केली. ते 28 आणि 34 वयांचे आहेत. त्यांच्याकडे चिनी पासपोर्ट आहे पण त्यांच्याकडे भारतात प्रवेश करण्याचा कोणताही परवाना नव्हता.
त्यांच्याकडे आढळलेल्या मोबाइल फोनची आणि अन्य बाबींची तपासणी केली असता त्यांचा आर्थिक गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे आढळून आले आहे. त्यांनी नेपाळमधून भारतात प्रवेश केला होता व ते पुन्हा नेपाळकडेच निघाले होते.