नवी दिल्ली – भारतामध्ये कोरोनाची 100 कोटी लास आतापर्यंत देण्यात आली आहे. यामुळे अर्थव्यवस्था आणखी सक्रिय होण्यास चालना मिळेल असे उद्योजकांच्या संघटनांनी म्हटले आहे.
भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष टी व्ही नरेंद्रन यांनी सांगितले की, भारतातील संशोधक, डॉक्टर, कर्मचारी आणि इतरांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे कमी काळामध्ये मध्ये तब्बल 100 कोटी लस देण्यात भारताला यश मिळाले आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये करोनाची कसलीही लाट येण्याची शक्यता कमी झाली आहे.
परिणामी अर्थव्यवस्था सक्रिय होण्यास यामुळे मदत मिळेल. या तिमाहीमध्ये भारताचा विकास दर वाढेल असे त्यांनी सांगितले. असोचेम या उद्योजकांच्या संघटनेचे महासंचालक दीपक सूद म्हणाले की, पुढील काही आठवड्यामध्ये भारतामध्ये 100 टक्के लसीकरण होईल. त्यामुळे ग्राहकांचा आत्मविश्वास वाढेल आणि कारखान्यातील उत्पादनाबरोबरच विक्री यंत्रणाही पूर्ण ताकतीने सक्रिय होण्याची शक्यता आहे.
भारतीय उद्योग महासंघाचे महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी यांनी सांगितले की, ही लस भारतात तयार झाली आहे. त्यामुळे आगामी काळात आरोग्य क्षेत्रात कसलाही प्रश्न निर्माण झाल्यानंतर भारत अशा प्रश्नांचा मुकाबला ताकतीने करू शकणार आहे. दरम्यानच्या काळामध्ये विविध क्षेत्रात बऱ्याच सुधारणा झाल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात आर्थिक विकास दर वाढण्यास मदत होणार आहे.