पुणे – रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मान्सून सुरू होण्याआधी इन्फ्लुएन्झाची लस घेण्याची शिफारस महाराष्ट्राचे कोव्हिड-१९ टास्कफोर्स आणि बालरोगतज्ज्ञांचा समावेश असलेल्या टास्कफोर्सने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या व्हर्च्युअल बैठकीमध्ये केली.
या लसीचा राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात समावेश करण्याची शिफारसही टास्कफोर्समधील तज्ज्ञ डॉक्टरांनी केली. असे केल्याने एकूणच फ्लूच्या घटनांना आळा बसू शकेल तसेच तिस-या लाटेची आशंका वर्तवली जात असताना सारख्याच लक्षणांमुळे कोव्हिड-१९ आणि फ्लू यांच्यामध्ये गल्लत होणार नाही.
इन्फ्लूएन्झा लसीकरणाबाबत पुण्यातील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज येथील पेडिएट्रिक्स प्रोफेसर डॉ. संपदा तांबोळकर म्हणाल्या, या प्रादुर्भावामुळे आपल्याला आरोग्याला प्राधान्य देण्याची मोठी शिकवण मिळाली आहे. म्हणूनच लसीकरणासारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना लसीमुळे प्रतिबंध करता येण्यासारख्या आजारांविरोधात राबवल्या पाहिजेत. लसीकरणामध्ये विलंब ही देखील वाढती समस्या आहे आणि विशिष्ट डोसेस घेण्याच्या कालावधीवर परिणाम झाल्यामुळे १ वर्षांखालील मुले असुरक्षित झाली आहेत. वेळेवर प्राथमिक लसीकरण केल्यास त्यांचे आजारांपासून संरक्षण होऊ शकेल.
इन्फ्लूएन्झा व कोविड या आजारांमध्ये ताप, सर्दी व खोकला यांसारखी समान लक्षणे आढळून येतात. पण इन्फ्लूएन्झा लस इन्फ्लूएन्झा आजाराला प्रतिबंध करते, कोविडला नाही. बहुतांश इन्फ्लूएन्झा केसेस पावसाळ्यादरम्यान आढळून येतात आणि प्रादुर्भाव विशेषत: कोविड-१९ काळादरम्यान अनावश्यक हॉस्पिटल खर्च व चाचणीसह आरोग्य पायाभूत सुविधांवर तणाव निर्माण करेल.
म्हणूनच पावसाळा सुरू होण्यापूर्वी ६ महिने ते ५ वर्षांपर्यंतच्या मुलांना, तसेच सीओपीडी, दमा, मधुमेह असे कोमोर्बिड आजार असलेल्या व्यक्तींना आणि डॉक्टरांशी सल्लामसलत करत कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींना देखील इन्फ्लूएन्झा लस घेण्याची शिफारस करण्यात येत आहे.
पालकांनी आपल्या मुलांचे लहानपणीच लसीकरण करण्यास प्राधान्य द्यावे असा सल्लाही तज्ज्ञ मंडळी देतात, कारण ती एक अत्यावश्यक आरोग्य सेवा आहे. मुलांना आणि विशेषत्वाने लहान बाळांना डिप्थेरिया, टिटॅनस, पर्ट्युसिस, हेपटायटीस बी, पोलियोमायलिटीस आणि एच. इन्फ्लुएन्झा टाइप बी यांसारख्या आजारांविरोधात संरक्षक कवच पुरविण्यासाठी देण्यात येणा-या प्राथमिक लसी तर लवकरात लवकर दिल्या पाहिजेत.
लसीकरणाला विलंब झाला तर त्यामागोमाग द्यायच्या लसीच्या डोसांचे वेळापत्रक कोलमडू शकते. असे झाल्यास एरवी वेळच्यावेळी लस दिल्याने मुलांना ज्या आजारांपासून संरक्षण मिळाले असते ते आजार त्यांना होण्याची शक्यता वाढते कारण त्यांना संरक्षणच मिळेल.
कोव्हिड-१९ ने लसीकरणाचे महत्त्व कधी नव्हे इतकी ठळकपणे आपल्यासमोर आणले आहे, तरीही अनेक जण इन्फ्लुएन्झासारख्या लसीकरणाद्वारे अटकाव करता येण्याजोग्या आजारांविरोधात प्रतिबंधात्मक यंत्रणा म्हणून लस घेण्यास टाळाटाळ करत असतात. फ्यूची लक्षणांची तीव्रता ही हवामानावर अवलंबून असते, त्यामुळे हा एक मोसमी आजार ठरतो.
भारतामध्ये उन्हाळा आणि मान्सूनदरम्यान इन्फ्लुएन्झाच्या रुग्णांची संख्या कळस गाठते. भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेने पॅनडेमिकविरोधात सुरू असलेल्या लढ्यामध्ये सहभागी होणे, ज्या आजारांना अटकाव होऊ शकतो अशा आजारांच्या प्रतिबंधासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे ही काळाची गरज आहे. इन्फ्लुएन्झा लस ही इन्फ्लुन्झाविरोधात अशी प्रतिबंधात्मक यंत्रणा खात्रीने पुरवू शकते.