लखनऊ – देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. कोरोना बाधितांची संख्या दररोज नवनवे उच्चाक गाठत आहे. त्याबरोबरच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडाही वाढला आहे. भारतात दररोज अडीच हजाराहून अधिक जण मृत्युमुखी पडत आहेत. आरोग्य यंत्रणेवरील ताण प्रचंड वाढला आहे. स्मशानभूमीत दफनविधीसही मृतदेह वेटिंगवर आहेत. अश्यातच अँबुलन्स न मिळाल्याने हतबल झालेल्या मुलाने आपल्या वडिलांचा मृतदेह कारवर बांधून स्मशानभूमीत नेल्याची घटना समोर आली आहे.
उत्तरप्रदेशातील जयपूर हाऊस येथील रहिवासी किशोर यांच्या वडिलांचे शनिवारी कोरोनामुळे निधन झाले. मृतदेह अंत्यसंस्कारासाठी दफनभूमीत नेण्यासाठी अँबुलन्स हवी होती. खूप प्रयत्न करूनही अँबुलन्स न मिळाल्याने किशोर यांनी आपल्या वडिलांचा मृतदेह कारवर बांधून दफनभूमीत नेला. यातून कोरोनाची भीषणता जाणवते.
दरम्यान, उत्तर प्रदेशातील कोरोनाची स्थिती भयंकर बनली आहे. येथील एका स्मशानभूमीत दररोज 35 हुन अधिक कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. एका अँबुलन्स मध्ये 3-3 मृतदेह आणले जात आहेत. अंत्यसंस्कारसाठी 5-6 तासाचे वेटिंग आहे.