सातारा – शासनाने पहिली ते बारावीसाठी शैक्षणिक चॅनेल सुरू केले आहेत. युट्युब, जिओ चॅटची सुविधा उपलब्ध आहे. टॅब किंवा स्मार्टफोनद्वारे व्हर्च्युअल पाठ घेणे, पुस्तकांच्या सहाय्याने स्वयंअध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहून मार्गदर्शन करणे, सेवानिवृत्त तसेच अन्य स्वयंसेवी शिक्षकांची मदत घेणे.
त्यासाठी शिक्षकमित्र संकल्पना प्रत्यक्षात आणून शिक्षणासाठी ऑनलाईन बरोबरच सर्व पर्याय वापरावयाच्या सूचना माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी व्हीसीद्वारे आयोजित बैठकीत दिल्या.
जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांची ऑनलाईन बैठक झूमद्वारे दोन टप्प्यात घेण्यात आली. बैठकीस सुमारे सातशे मुख्याध्यापकांसह गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख उपस्थित होते. 22 जुलैच्या परिपत्रकानुसार इयत्ता नववी व अकरावीला अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेऊन कामकाज पूर्ण करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सरल प्रणालीत विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करणे, विद्यार्थी प्रमोशन करणे आणि नवीन प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचे रिक्वेस्ट पाठवणे अपडेट करणे इत्यादी कामे लवकरात लवकर 100 टक्के पूर्ण करण्याचे आवाहन क्षीरसागर यांनी केले.
“शाळा बंद परंतु शिक्षण सुरु’ यानुसार कोणत्याही माध्यमातून 100 टक्के विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षकांनी पोहोचणे, अभ्यासक्रम शिकवणे, त्यांना मार्गदर्शन करणे या विषयावर विस्तृत चर्चा
करण्यात आली.
10 पूर्वी जिल्ह्यातील सर्व संस्थांनी बिंदू नामावली तपासून घेण्यासाठी तालुकानिहाय कॅम्प लावण्यात आलेला असून सर्व संस्थांनी आपल्या संस्थेचे रोस्टर तपासून घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. ज्यांची सेवक संच दुरुस्ती आहे, त्यांच्यासाठी संचालक स्तरावरून काही दिवसातच दुरुस्तीचा कॅम्प लावण्यात येणार आहे.
ज्यांची दुरुस्ती असेल त्यांनी आपली सेवक संच निश्चिती दुरुस्ती कॅम्पमध्ये करून घ्यावी. प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती, पालक, विद्यार्थी, शिक्षक यांच्याबाबतीत काय मार्गदर्शक तत्त्वे असावीत त्याचा शालेय स्तरावर आराखडा तयार करण्याच्या सुचना क्षीरसागर यांनी केल्या.
ऑनलाईन शिक्षणाची सुविधेचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यासाठी प्रयत्न करणे, युट्युब चॅनेलचा वापर करणे, जिओ टीव्हीचा वापर करणे इत्यादी माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करून त्यांना शिक्षण देणे याचाही चांगल्याप्रकारे ऊहापोह करण्यात आला. अकरावी प्रवेश याबाबतीत कनिष्ठ महाविद्यालयांनी योग्य ती कार्यवाही, तयारी करायची असून प्रवेश ऑनलाईन करावेत. शालेय पोषण आहाराच्या बाबतीत 34 दिवसांचा पोषण आहार शालेय स्तरावर आल्यानंतर शाळांनी आपल्या ताब्यात घ्यायचा आहे.
पवित्र पोर्टलमधून होणारी भरती साधारणपणे दोन महिन्यानंतर सुरू होणार असून यापुर्वी ज्या शिक्षकांची पवित्रमधून नियुक्ती झालेली आहे, त्यांच्याबाबतीत शालार्थ आयडी महत्त्वाचा आहे. कोणीही कर्मचारी यापासून वंचित राहणार नाही याची शालेय प्रशासनाने दक्षता घ्यावी, असे आवाहन क्षीरसागर यांनी केले.
माध्यमिक शिक्षण विभागाकडून शिक्षकेतर कर्मचारी माहितीबाबतचा तयार केलेला नमुना भरून ही माहिती शिक्षण विभागाकडे द्यावी. वरिष्ठ आणि निवड श्रेणीच्या बाबतीत ज्यांचे प्रस्ताव कार्यालयाकडे प्रलंबित आहेत, ज्यांचे प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे, परंतु प्रमाणपत्र सादर करावयाचे राहिले आहे त्यांनी माध्यमिक शिक्षण विभागाकडे ई-मेलद्वारे प्रमाणपत्र पाठवायचे आहे. आयसीटी योजनेअंतर्गत शाळांना प्राप्त झालेल्या संगणकाविषयी आवश्यक माहिती व सद्यस्थिती एमपीएसपीच्या लिंकवर तात्काळ भरावी.
स्वयंअर्थसहाय्यित शाळांनी शुल्क अधिनियम 2011नुसार कार्यकारी समितीची बैठक घेऊन इतिवृत्ताची प्रत गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करावी, अशा सूचना करण्यात आल्या. या बैठकीत उपशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, सुधीर महामुनी, हणमंत जाधव, साईनाथ वाळेकर, वेतनपथक अधिक्षक अनिल बनसोडे यांनीही विषयानुरूप मार्गदर्शन केले.
रात्री आठनंतर पालकांना मेसेज पाठवू नका
करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात ऑनलाईन शिक्षण घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांकडे कमीत कमी वेळ मोबाईल राहावा या दृष्टीने त्यांना शिक्षण देण्याची गरज आहे. रात्री आठनंतर शाळांच्यावतीने पालकांना कोणत्याही प्रकारचा मेसेज पाठवू नका. शक्यतो पालकांच्या उपस्थितीतच व्हर्च्युअल पाठ घ्यावेत, असे आवाहन शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी केले. संस्थांनी पालकांना, विद्यार्थ्यांना फी बाबत सक्ती करु नये अशा सूचनाही त्यांनी दिल्या.