मुंबई – महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता एकत्र यावे, अशी मागणी शिवसैनिक आणि मनसैनिक गेल्या काही दिवसांपासून करू लागले आहेत. या मागणीबाबतचे फलकही त्यांच्याकडून ठिकठिकाणी लावले गेले होते. तर, सोशल मीडियावर देखील अनेक पोस्ट व्हायरल करण्यात आले आहेत.
दोन दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यास तयार असल्याचे म्हटले गेले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात चर्चा करण्यास तयार असल्याचे खासगीत म्हटले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘मी राज ठाकरे यांना फोन करण्यास तयार आहे आणि वेळ आल्यास राज ठाकरे यांच्यासह बोलणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे’.
दरम्यान, अश्यातच आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी एक विधान केलं असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावण्यात आले आहे. ते म्हणाले, सध्या राज्यात जो असंतोष निर्माण झालेला आहे,
त्या असंतोषाला राज ठाकरे हे वाचा फोडू शकतात. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मोठ्या भावाची भूमिका घेऊन राज ठाकरे यांच्या पाठीशी थांबणं गरजेचं आहे आणि राज ठाकरे यांना राज्यात नेतृत्व करण्याची संधी दिली पाहिजे. असं ते म्हणाले.
तसेच ते पुढे म्हणाले, राज्यात राज ठाकरे यांनी नेतृत्व केलं तर बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, स्वाभिमान, हिंदुत्व आणि मराठीपण महाराष्ट्रात टिकून राहिल. तर गेल्या काही दिवसांत राज्यात जी काही राजकी परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्यामुळे जनता अस्वस्थ आहे. जनतेला हे काहीच आवडलेले नाही. या असंतोषाचा जनक होण्याची क्षमता केवळ राज ठाकरे यांच्यात आहे. पण उद्धव ठाकरे यांनी त्यांना नेतृत्व देऊन आशीर्वाद दिले पाहिजे. असं देखील प्रकाश महाजन यावेळी बोलले.