मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या टॉप पाच मुख्यमंत्र्याच्या यादीत स्थान मिळवले आहे. सध्या आजारपणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सार्वजनिक कार्यक्रमांना हजर राहत नाही. मात्र, त्यांची लोकप्रियता कायम आहे. एका माध्यम समुहाने केलेल्या सर्वेक्षणात उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
एका माध्यम समुहातर्फे प्रत्येक राज्यातील नागरिकांना त्यांच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीबाबत सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणानंतर 43 टक्क्यांहून अधिक मतं मिळालेल्या नऊ मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौथ्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. सर्वोत्तम कामगिरी करण्याऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी स्थान मिळवले आहे. पटनायक यांनी केलेली कामगिरी 71.1 टक्के नागरिकांना समाधानकारक वाटली.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा क्रमांक आहे. ममता यांच्या कामगिरीवर 69.9 टक्के लोकांनी समाधान मानले. यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चौथा क्रमांक लागला आहे. उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीवर 61.8 टक्के जनता समाधानी आहे. तर, केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन या यादीत पाचव्या स्थानावर आहेत. त्यांच्या कामावर 61.6 टक्के जनतेने समाधान व्यक्त केले आहे.
भाजपचा केवळ एक मुख्यमंत्री
या यादीत सहाव्या क्रमांकावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आहेत. 57.9 टक्के जनता त्यांच्या कामगिरीवर समाधानी आहे. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या नऊ मुख्यमंत्र्यांच्या यादीत भाजपचे केवळ एक मुख्यमंत्री आहेत. आसामचे मुख्यमंत्री हेमंत विस्व शर्मा सातव्या क्रमांकावर आहेत. आसाममधील 56.6 टक्के जनतेने त्यांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले. यानंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (51.4 टक्के), राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (44.9 टक्के) यांचा क्रमांक आहे.