पिंपरी -दुचाकी चोरीच्या वाढत्या प्रकरणांमुळे पोलीस हतबल झाले आहेत. मात्र, दुसरीकडे वाहनधारक बेफिकीर असल्यानेच दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. दुचाकीच्या सुरक्षेसाठी दुचाकीच्या किमतीपेक्षा अत्यंत कमी खर्च येतो, तरीही वाहनधारक सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजनाही करत नाहीत.
वाढत्या दुचाकीचोरीमुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली असली तरीही चोरी थांबत नाही ही वस्तुस्थिती आहे. चोऱ्या रोखण्यासाठी दुचाकीमालकानेही अधिक सतर्क राहिले पाहिजे. अतिशय कमी खर्चात दुचाकीची सुरक्षा करणे शक्य आहे. मात्र दुचाकीस्वार दुचाकीच्या लॉकवर विसंबून राहतात, दुचाकीचे लॉक तोडण्याची कला चोरट्यांकडे असते, त्यामुळे अजून एखादे अतिरिक्त लॉक लावल्यास चोरीचे प्रमाण कमी होऊ शकते.
अनेक वाहनांचा विमा असल्याने नागरिक चोरीला गेलेल्या वाहनांची तक्रार तर करतात. मात्र काही महिन्यानंतर विम्याचे पैसे मिळाल्यावर नवीन वाहन खरेदी करतात. त्यामुळे जुन्या वाहनाचा शोध घेणे थांबवितात.
पेट्रोल संपल्यावर अनेकदा चोरटे दुचाकी रस्त्यात सोडून देतात. अशी वाहने सापडल्यानंतर पोलीस वाहनाच्या मालकाचा नाव, पत्ता शोधून काढतात. मात्र अनेकदा तो भाडेकरू होता. तो घर सोडून निघून गेला आहे. आता दुचाकीचा मालक कुठे आहे याचा पत्ताच लागत नसल्याने अशी वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात धूळ खात पडलेली असतात.
अशा उपाययोजना करता येतील
वाहने बेवारस स्थितीत रस्त्यावर उभी करू नये.
अतिरिक्त (डबल) लॉकचा वापर करावा. (पाचशे रुपयांपर्यंत मिळतात)
अलार्म सिस्टीम किंवा जीपीआरएस सिस्टीम बसवावी. (दोन ते पाच हजार रुपयांपर्यंत उपलब्ध)
चेन लॉक, ग्रीप लॉक किंवा जामरचा वापर करावा. (पाचशे ते अडीच हजारांच्या दरम्यान उपलब्ध आहे).
घराजवळ किंवा पार्किंगमध्ये नाइट व्हिजन कॅमेरे बसवावेत. (दहा ते पंचवीस हजांरांच्या दरम्यान उपलब्ध आहेत)
===================