मुंबई – केंद्रीय मंत्रिमंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे फेरबदल केले आहेत. यानंतर आता राज्यातही मंत्रिमंडळात बदलाचे वारे वाहताना दिसत आहेत. कॉंग्रेसच्या दोन मंत्र्यांना त्यांच्या कामगिरीच्या आधारावर नारळ मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ग्रामीण भागात काम करणारा एक मंत्री आणि मुंबईतील एक मंत्री अशा दोघांना मंत्रिमंडळातून हटवले जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी राज्यमंत्री म्हणून चांगले काम करणाऱ्या एका मंत्र्याला कॅबिनेट पदी बढती मिळू शकते.
पुढच्या चार-पाच महिन्यांत सरकारला दोन वर्षे पूर्ण होणार आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसला हा बदल महत्त्वाचा वाटतो आहे. बदलांची चर्चा सुरू झाली की कॉंग्रेसमध्ये नाना पटोले मंत्री बनणार का असेही कयास सुरू होतात. मात्र तूर्तास तरी ती शक्यता नाकारण्यात आली आहे.
नाना पटोले यांना महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी देतानाच त्यांनी पक्षासाठी पूर्णवेळ काम करावे, अशी इच्छा दिल्ली हायकमांडने व्यक्त केली होती. त्यामुळे ज्या दोन जागा रिक्त होतील त्या जातीय आणि प्रादेशिक संतुलनाच्या जोरावर भरल्या जातील, असे दिसत आहे.
हा बदल नेमका कधी होणार, याबद्दलची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. पण मुख्यमंत्र्यांच्या संमतीने लवकरच हा बदल होऊ शकतो, असे सांगितले जात आहे.