पुणे – केंद्र पुरस्कृत नव भारत साक्षरता कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बजाविले असतानाही शिक्षक, शिक्षणाधिकारी यांनी त्याकडे कानाडोळा केला आहे. शिक्षक संघटनांनी निरक्षरांच्या सर्वेक्षणावरील बहिष्कार कायम ठेवला आहे. त्यामुळे उल्लास अपॅमध्ये भरलेल्या निरक्षर व स्वयंसेवकांच्या नोंदणीचा अहवाल अतिशय निराशाजनक असल्याची बाबही उघड झाली आहे.
सन 2011 च्या जनगणनेनुसार राज्यात सर्व वयोगटातील 1 कोटी 78 लाख व्यक्ती निरक्षर आढळून आल्या होत्या. त्यात 15 व त्याहून अधिक वयोगटातील 1 कोटी 63 लाख व्यक्ती निरक्षर आहेत. राज्याला मागील व चालू वर्षाचे मिळून 12 लाख 40 हजार निरक्षरांची सर्वेक्षणाद्वारे माहिती जमा करून कार्यक्रमही निश्चित करून त्यादृष्टीने कामकाज सुरू करण्यात आले.
निरक्षरांच्या सर्वेक्षणाबाबतचे आदेश योजना शिक्षण संचालनालयाकडून जारी केले होते. मात्र, शिक्षक संघटनांनी या सर्वेक्षणावर बहिष्कार टाकला. तो मागे घ्यावा, यासाठी अनेकदा बैठकाही झाल्या. मात्र, संघटना ठामच आहेत. विद्या प्राधिकरणात 16 व 17 ऑक्टोबर या दोन दिवशी अधिकाऱ्यांची कार्यशाळाही घेण्यात आली होती. यात शालेय शिक्षणमंत्र्यांनी नव भारत साक्षरता कार्यक्रम सक्षमपणे राबविण्याचे आदेश दिले होते. तरीही फारशी प्रगती झाली नसल्याचे चित्र उघड झाले आहे.
“केंद्र शासनाच्या “उल्लास’ ऍपमध्ये भरलेली निरक्षर, स्वयंसेवकांची संख्या नोंदविण्यासाठी येत्या 7 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातील जिल्ह्यांचे निर्धारित केलेले उद्दिष्ट प्राप्त करण्याबाबतच्या सूचनाही बैठका घेऊन दिल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, डायटचे प्राचार्य यांना आदेशही बजाविले आहेत.” – डॉ.महेश पालकर, संचालक, योजना शिक्षण संचालनालय
नव भारत साक्षरता कार्यक्रमाची सद्यस्थिती
- निरक्षरांची एकूण नोंदणी – 33,950
- निरक्षरांचे ऑनलाईन टॅगिंग पूर्ण- 7,452
- निरक्षरांचे टॅगिंग अपूर्ण- 26,498
- स्वयंसेवकांची एकूण नोंदणी – 4,632
- स्वयंसेवकांचे ऑनलाईन टॅगिंग पूर्ण- 1,672
- स्वयंसेवकांचे टॅगिंग अपूर्ण-2,960