नगर -परदेशात ओमायक्रानचा संसर्ग वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर सूचना घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. जिल्ह्यात आजही नऊ लाख लोकांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही. तर, पाच लाख लोकांनी फक्त एक डोस घेतला आहे. त्यामुळे गावोगाव जाऊन लसीकरण करा. लस न घेणाऱ्यांचे पेट्रोल, रेशनसारख्या शासकीय सुविधा बंद करा, अशा कडक सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.
पालकमंत्री मुश्रीफ यांनी आज जिल्हा नियोजन भवानामध्ये आवाढा बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके, निवासी जिल्हाधिकारी संदीप निश्चित, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, की ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आता नागरिकांचा लसीकरणाकडे ओढावा वाढला आहे. मात्र, त्याही तुलनेत लसीकरण होत नाही. त्यामुळे लस न घेणाऱ्या वाडी-तांड्यावरील नागरिकांचा शोधून काढा आणि त्यांना लस द्या. दरम्यान, नगर जिल्ह्यात कोविड काळातील सर्वात कमी रुग्ण संख्या या महिन्यात आढळून आली आहे.
करोना रुग्ण तपासणीमध्ये नगर जिल्हा राज्यात पहिल्या स्थानावर असण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात 97.90 टक्के रुग्णांची तपासणी करण्यात आली. तरी जिल्ह्यातील करोना संपलेला नाही.
कर्जत येथील प्रचार सभेत मास्कचा वापर झाला नाही त्यावर पालकमंत्री म्हणाले, की प्रत्येकाने मास्क वापरला पाहिजे या मताचा मी आहे.
50 हजारांचा लाभ 162 जणांना…
राज्य सरकारने कोविड काळात करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या वारसांना 50 हजार रुपयांची मदतीची घोषणा केली. जिल्ह्यात करोनामुळे 7 हजार 714 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातील काही वारसांनी त्या रक्कमेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केला. 7,114 पैकी 162 जणांना या मदतीचा भाव मिळाला आहे. ऑनलाइन पद्धतीमुळे अनेक लाभधारक वंचित राहिले. त्यामुळे आरोग्य विभागाच्या सचिवांशी ऑफलाइन अर्ज दाखल करण्याबाबत चर्चा करणार आहे, असे पालकमंत्री म्हणाले.
माहिती घेऊन सांगतो… लवकरच दुरुस्त होईल
जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागून त्यात 14 लोकांचा होरपळून व गुदमरून मृत्यू झाला. त्यानंतर अनेक मंत्री, पदाधिकारी आले. याप्रकरणी विभागीयस्तरावर समिती नेमण्यात आली होती. समितीने आरोग्यमंत्र्यांना अहवाल दिला आहे. त्यात नेमके काय आहे, असा प्रश्न पत्रकारांशी विचारला असता पालकमंत्री म्हणाले, विचारून पाहतो आणि आरोग्य मंत्र्यांना निष्कर्ष काढण्यास सांगतो. जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लॅंट बंद बाबत विचारले असता लवकरच दुरूस्त होईल, असेही ते म्हणाले.
जानेवारी-फेब्रुवारीत तिसरी लाट
ओमायक्रॉनचा संसर्ग परदेशात वाढत आहे. तज्ञांचे मते भारतात जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यात तो लहान मुलांमध्ये जास्त प्रादुर्भाव झालेला आहे. मुंबईमध्ये एकाच शाळेत 16 मुलांना संसर्ग झाला. पण तरीही शाळा बंद होणार नाहीत. मुलांची आई-वडिलांनी काळजी घ्यावी, असे ते म्हणाले.