जुन्नर – पतीच्या निधनानंतर स्त्रीला स्वतःच स्वतःचा आधार बनून कुटुंबाचा सांभाळ करावा लागतो. परिस्थितीशी दोन हात करत धैर्याने सामना करून त्या मार्गक्रमण करतात. म्हणूनच समाजाची मानसिकता बदलत एक नवीन पायंडा पाडण्यात आला.
तुळजाभवानी प्रतिष्ठान जुन्नरच्या वतीने विधवा महिलांना हळदीकुंकू लावून भेटवस्तू, तिळगूळ, सॅनिटायझर देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला, अशी माहिती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा उज्वला शेवाळे यांनी दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या फापाळे होत्या. याप्रसंगी राधिका कोल्हे, सरिता कलढोणे, स्वप्नजा मोरे, छाया वाळुंज, सुनिता वामन, प्रतिभा केदारी, पूनम तांबे, उर्मिला थोरवे, छाया शेवाळे, माधुरी म्हसकर, अंजली दिवेकर, माया खत्री, सुजाता ढोबळे, अनिता ढोबळे, जोत्स्ना वेदपाठक, मनिषा काळे, मनिषा खेडकर, आशा केदारी, मनिषा लोखंडे या सदस्या उपस्थित होत्या.
स्त्रियांनीच स्त्रियांचा आदर करावा, समाजाने विधवा महिलाची अवहेलना न करता यांच्या सारखा आमचा आधार व्हावे असे मत व कृतज्ञता आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्या फापाळे यांनी व्यक्त केली. उज्वला शेवाळे यांनी हळदी-कुंकवाचे महत्व व जीवनातील सकारात्मकता यावर मार्गदर्शन करीत सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक केले.
वाण आरोग्याचं याविषयावर डॉ. वैशाली गायकवाड यांनी आहार, विहार, आचार यावर सखोल मार्गदर्शन केले. सुवर्णा ढोबळे यांनी स्त्री आणि संघर्ष याविषयी आपले विचार मांडले. जमलेल्या अनेक महिलांनी कार्यक्रमा बद्दल समाधान व आनंद व्यक्त करीत आयोजकांना धन्यवाद दिले.. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.. सूत्रसंचालन छाया जोशी यांनी केले तर आभार पुष्पा बुट्टे यांनी मानले.