पुणे – आज 21व्या शतकात वावरत असताना, विज्ञानवादी व प्रगतीशील समाज म्हणून आपण वाटचाल करत आहोत. मात्र, आजही समाजात विधवा प्रथेसारख्या अनिष्ट प्रथा प्रचलित असल्याचे आढळून येते. पतीच्या निधनावेळी पत्नीचे कुंकू पुसणे व अन्य कूप्रथांचे समाजात पालन केले जात आहे. या प्रथेचे पालन करणे अनुचित असून त्याबाबत समाजात व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदेला दिल्या आहेत. तसेच राजर्षीी शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी वर्षात त्यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या दृष्टीने कृतीशील कार्यवाही करावी, अशा सूचनाही ग्रामविकास विभागाने दिल्या आहेत.
राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षात त्यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जोपासत, हेरवाड ग्रामपंचायतने केलेली ही कृती स्तुत्य असल्याचे ग्रामविकास विभागाने म्हटले आहे. पतीचे निधन झाल्यानंतर त्याच्या पत्नीला विधवा म्हणून समाजात वावरत असताना अवहेलनेस सामोरे जावे लागते. या महिलांना त्यानंतर समाजात कोणत्याही प्रकारच्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ दिले जात नाही. या कुप्रथांचे पालन होत असल्याने अशा व्यक्तींच्या प्रतिष्ठेने जीवन जगण्याच्या मानवी अधिकाराचे तसेच भारतीय संविधानाने बहाल केलेल्या समतेच्या हक्काचेही उल्लंघन होते. त्यामुळे अशा प्रथेचे निर्मूलन होणे ही काळाची गरज आहे.
या बाबी लक्षात घेता, विधवा प्रथा निर्मूलन होण्याच्या अनुषंगाने समाजात व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेला दिल्या आहेत. या प्रकरणी जनजागृती होणेच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करणेबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सर्व यांनी आपल्या स्तरावरून सर्व अधिनस्त ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांना सूचित करावे तसेच ग्रामपंचायत हेरवाड यांनी केलेल्या ग्रामसभा ठरावा प्रमाणेच राज्यातील सर्व ग्रामपंचायतीना ठराव घेणेबाबत प्रोत्साहित करावे, अशा सूचना ग्रामविकास विभागाचे अवर सचिव सुहास जाधवर यांनी दिल्या आहेत.
काय आहे “हेरवाड’ पॅटर्न
विधवा महिलांना इतर महिलांप्रमाणे सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यानुसार ग्रामपंचायत हेरवाड ता. शिरोळ, जि. कोल्हापूर यांनी दि. 5 मे 2022 रोजी मंजूर केलेल्या ग्रामसभा ठरावान्वये, समाजात प्रचलित असलेली अनिष्ट विधवा प्रथा बंद करणेबाबतचा ठराव सर्वानुमते मंजूर केला आहे. त्यानुसार पतीच्या निधनावेळी पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढली जाणे यांसारख्या कूप्रथांचे समाजात पालन केले जाणार नाही.