मणिपूरमध्ये कॉंग्रेसचा आरोप
नवी दिल्ली – मणिपूरमध्ये बंदी घातलेल्या बंडखोरांच्या गटाला 17 कोटी रुपयांची मदत करून भाजपकडून आदर्श आचार संहितेचा भंग केला जात आहे, असा आरोप कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. मणिपूरच्या विधानसभेच्या निवडणूकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान 28 मार्च रोजी झाले आहे आणि दुसऱ्या टप्प्यात 7 मार्च रोजी मतदान होणार आहे.
मणिपूरमधील कुकी बंडखोरांच्या संघटनेला केंद्रीय गृहमंत्रालयाने 1 फेब्रुवारी रोजी 15.7 कोटी रुपये आणि 1 मार्च रोजी 92.7 लाख रुपयांची मदत केली आहे. ही मदत करण्यात “सस्पेन्शन ऑफ ऑपरेशन’ अंतर्गत बंदी घातलेल्या गटाला करण्यात आली आहे. मणिपूरच्या 4 जिल्ह्यांमधील निवडणुकीची ही एक क्रूर चेष्टा आणि आचार संहितेचा भंग असल्याचा आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मणिपूरसाठीचे निरीक्षक जयराम रमेश यांनी ट्विटरवरच्या पोस्टमध्ये केला आहे.
सरकारने दिलेल्या या मदतीमुळे मणिपूरमधील चुराचंदपूर आणि कांगपोकपी या जिल्ह्यांमध्ये झालेली निवडणूक पूर्ण पारदर्शी आणि पारदर्शी वातावरणात झाली नाही, असा दावाही रमेश यांनी केला आहे.
बहुसंख्य राज्य सरकार कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांपासून पगार मिळाला नाही. मध्यान्ह भोजनाच्या आचाऱ्यांना 18 महिन्यांपासून पैसे मिळू शकलेले नाहीत. गेल्या 6 महिन्यांपासून पेन्शनही मिळालेले नाही. अशाच काळात बंडखोरांना मदत केली जात आहे, ही विसंगती असल्याचेही रमेश यांनी म्हटले आहे.
12 मतदार केंद्रांवर 5 मार्चला फेरमतदान
इम्फाळ – मणिपूरमधील 5 मतदारसंघातील 12 मतदान केंद्रांवर 5 मार्च रोजी फेरमतदान केले जाणार आहे. मणिपूरचे मुख्य निवडणूक अधिकारी राजेश अगरवाल यांनी आज ही माहिती दिली. 28 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यामध्ये या मतदान केंद्रांवर झालेल्या मतदानाच्यावेळी तेथे हिंसाचार झाला होता. खुंद्रकपम, सैतू, थॅनलॉन, हेंगलेप आणि चुराचंदपूर विधानसभा मतदारसंघातील 12 मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान होणार आहे. या मतदान केंद्रांवरील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आणि सत्य पडताळणी केल्यानंतर केलेल्या शिफारशींच्या आधारे हा फेरमतदानाचा निर्णय घेण्यात आला आहे.