हिवरे येथील घटना, एक आरोपी अल्पवयीन
सांगली – सांगली जिल्ह्यातील हिवरे (ता. खानापूर) येथील तिहेरी खून खटल्यात सुधीर सदाशिव घोरपडे (वय 29, रा. धोंडेवाडी, ता. खानापूर) व रवींद्र रामचंद्र कदम (वय 30 रा. भुड, ता. खानापूर) यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी. सातवळेकर यांनी आज आजन्म कारावास आणि प्रत्येकी एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
आरोपींकडून वसूल करण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेतून फिर्यादी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराला प्रत्येकी 50 हजार रुपये भरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या खटल्यात सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम व सहाय्यक म्हणून जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे यांनी तर बचाव पक्षाकडून ऍड. प्रमोद सुतार यांनी काम पाहिले.
या खटल्याची पाश्वभूमी अशी, सुधीर घोरपडेची बहीण विद्याराणीचा विवाह हिवरे येथील बळवंत जर्नादन शिंदे यांच्याशी झाला होता. लग्नानंतर विद्याराणीचा सासरच्या लोकांकडून छळ होत होता. या छळास कंटाळून तिने 2009 मध्ये आत्महत्या केली होती. मात्र, विद्याराणीचा खून करण्यात आल्याचा आरोप करत माहेरच्यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
त्यावेळी विद्याराणीच्या सासरच्या लोकांविरुद्ध खटला चालविण्यात आला होता. त्यातून बळवंत शिंदे याच्यासह शिंदे कुटुंबियांमधील तिघांची निर्दोष मुक्तता झाली होती, तरी सुधीर घोरपडे हा शिंदे कुटुंबियांवर चिडून होता. आपण जमीन मोजणी अधिकारी असल्याचे भासवून सुधीर घोरपडे, रवींद्र कदम हे एका अल्पवयीन मुलासह दि. 21 जून 2015 रोजी हिवरे येथील हसबे मळ्यात शिंदे यांच्या घरी गेले होते. त्यावेळी शिंदे कुटुंबातील कोणी पुरुष घरात नव्हता.
घरात केवळ तीन महिला होत्या. तिघांनी तहान लागल्याचा बहाणा करून बाळासाहेब शिंदे यांची आई प्रभावती यांना पाणी आणायला घरात पाठविले. त्यावेळी बाळासाहबे शिंदे यांची बहीण सुनीता पाटील व पत्नी निशिगंधा या घराबाहेर पटांगणात होत्या. तिघांनी त्यांच्यावर वार केले.
त्या दोघांनी केलेला प्रचंड आक्रोश ऐकून प्रभावती घराबाहेर पळत आल्या. त्यांच्यावरही तिघांनी चाकूने वार केले. या हल्ल्यात गंभीर झालेल्या तिघींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारा सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला होता. ही घटना घडल्यानंतर हल्लेखोरांनी पलायन केले होते. या प्रकरणी बाळासाहेब शिंदे यांच्या फिर्यादीवरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात सरकार पक्षातर्फे 19 साक्षीदार तपासण्यात आले.