नाशिक – नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात उरुसाच्या मिरवणुकीत त्र्यंबकेश्वराला धूप दाखवण्यासाठी मुस्लीम बांधव मंदिराच्या उत्तर दरवाजाजवळ आल्यानंतर चांगलाच वाद पेटला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते हुसेन दलवाई ज्या उत्तर दरवाजाजवळ मुस्लीम बांधव पोहोचल्याने वाद झाला त्याच ठिकाणी पोहोचून दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी धार्मिक सौहार्द बिघडवणाऱ्यांना चांगलेच फटकारले.
दर्शन घेतल्यानंतर हुसेन दलवाई म्हणाले, गेल्या 100 वर्षांपासून संदल आणण्याची परंपरा आहे. बाबा शाहजहॉं याचे संदल याठिकाणी येते. महाराष्ट्रात जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अश्लाघ्य शब्दांचा वापर केला जात आहे. तुम्ही एसआयटी नेमा, पण देवेंद्र फडणवीसांना सांगणे आहे की, ज्या लोकांनी मोर्चे काढले, अश्लाघ्य भाषा वापरली त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करावी. येथील 10 ते 12 संघटना आहेत त्यांची चौकशी करा, ते लोकांना काय शिकवतात, याची चौकशी करा, अशी मागणी त्यांनी केली.
दलवाई पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली देशाची घटना मोडून मनुस्मृती आणायची असेल तर हे देशाच्या विरोधातील आहे. या देशात आता शिवाजी महाराजांनी पुन्हा जन्म घेणे आवश्यक आहे. महात्मा गांधी, फुले, आंबेडकरांनी जन्म घेणे आवश्यक आहे. सानेगुरुजी यांनी जन्म घेणे आवश्यक आहे, तर धार्मिक सलोखा राहील. तसेच आमच्यासारख्या लोकांनी लोकांना एकत्र आणले पाहिजे.
भाविकांची संख्या 40 ते 50 टक्क्यांनी रोडावली –
दुसरीकडे, त्र्यंबकेश्वरला धूप दाखवण्यासाठी मुस्लीम बांधव मंदिराच्या उत्तर दरवाजाजवळ आल्यानंतर वाद उफाळून आला आहे. हिंदू-मुस्लीम वादाची कधी साधी चर्चाही नसलेल्या त्र्यंबकेश्वर नगरीत तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पोलिसांची जादा कुमक तैनात करण्यात आल्याने त्र्यंबकेश्वरमधील भाविकांच्या संख्येवर विपरीत परिणाम झाला आहे. भाविकांची संख्या 40 ते 50 टक्क्यांनी रोडावली असल्याचे व्यावसायिक सांगत आहेत.