पुणे – दीड वर्षापासून लांबलेल्या महापालिका निवडणुकांमुळे आधीच मेटाकुटीस आलेल्या इच्छुकांवर आता डोक्यावर हात मारण्याची वेळ आली आहे. विशेषत: राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी गेले पाच वर्षे तयारी केलेल्या आणि सातत्याने भाजप विरोधात आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजित पवार की शरद पवार यांच्यापैकी कोणाला तरी निवडावे लागणार आहे.
त्यातच, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडूनही राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक गळाला लावण्यात येत होते.
मात्र, अजित पवारांच्या शपथ विधीमुळे या नगरसेवकांचाही गोंधळ वाढला असून, तिकिट कोणाकडून मिळेल आणि नेमकी कोणाच्या विरोधात लढायचे असा संभ्रम निर्माण झाला आहे.
लढायचे कोणाच्या विरोधात..
सन 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढले होते तर राष्ट्रवादी आणि कॉंगेस एकत्र लढले तर काही जागांवर दोन्ही पक्षांत मैत्रीपूर्ण लढत झाली. तर मनसेही स्वबळावर लढली होती. त्यावेळी सर्वाधिक 98 नगरसेवक भाजपचे निवडून आले. तर शिवसेना 10 आणि कॉंग्रेसचे 9 जण निवडून आले. मनसेचे अवघे दोन जण निवडून आले, तर राष्ट्रवादीने 44 जागा जिंकल्या. त्यानंतर महापालिकेत शिवसेना आणि भाजपने एकत्र सत्ता स्थापन केली.
मात्र, 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने शिवसेना विरोधी पक्षात जाऊन बसली. त्यानंतर, राज्यात सत्ताबदल झाल्याने 2021 मध्ये महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी विरोधात भाजप असा सामना रंगण्याचे निश्चित असतानाच; मागील वर्षी शिवसेनेचा मोठा गट महाविकास आघाडीतून बाहेर पडला. त्यामुळे, महापालिका निवडणुकांमध्ये पुण्यात शिवसेना आणि कॉंग्रेसचे संख्याबळ तुलनेने कमी असल्याने राष्ट्रवादी विरोधात भाजप असा सामना होईल, अशी चिन्हे होती.
मात्र, आता राष्ट्रवादीतून थेट अजित पवारच वेगळे होऊन सत्तेत सामील झाल्याने शहर राष्ट्रवादीतील अनेक इच्छुक त्यांच्या सोबत गेले आहेत. त्यातील अनेकांनी गेल्या पाच वर्षांत नगरसेवक होण्यासाठी भाजपच्या विरोधात काम केले आहे. त्यानंतर आता थेट अजित पवारच भाजपसोबत गेल्याने या कार्यकर्त्यांची नगरसेवक होण्याची स्वप्ने भंग होण्याची चिन्हे आहेत.
जागा वाटपाचा तिढा
पुण्यात 2007 पासून महापालिकेत राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. 2017 मध्ये मोदी लाटेतही शिवसेना, कॉंग्रेस, मनसेचे नगरसेवक केवळ एका आकड्यांच्या घरात निवडून आलेले असताना राष्ट्रवादीचे 42 जण निवडून आले होते. त्यामुळे पुण्यात अजित पवारांसोबत जास्त नगरसेवक गेल्यास त्यांची जागांची मागणी दुप्पटच असणार आहे. त्यातच, भाजप, रिपाइंचे 98 नगरसेवक असल्याने त्यांनाही जवळपास 120 पेक्षा अधिक जागा हव्या आहेत.
तर शिंदे गटालाही पुण्यात अस्तित्व निर्माण करायचे असल्याने त्यांनाही 30 ते 40 जागांची आवश्यकता आहे. हे पाहता पुण्यात केवळ 162 जागा असून, हे तीनही पक्ष एकत्र लढल्यास जागा वाटपाचा तिढा वाढणार आहे. त्यातच, अनेक जण 2017 मध्ये भाजपच्या विरोधात पराभूत झाले आहेत. त्यामुळे, त्यांना भाजपच्या विद्यमान विरोधात तिकिट मिळण्याची शाश्वती नसल्याची सध्याची स्थिती आहे.