पुणे : शहराच्या उशाला तब्बल 30 टीएमसी पाणी साठवण क्षमतेची चार धरणे आहेत. तरीही पुणेकरांना यंदा ऐन पावसाळ्यात पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी ही धरणे 100 टक्के भरलेली होती. त्यामुळे गेल्या काही वर्षातील पावसाची अनिश्चितता लक्षात घेऊन पाण्याचे वेळीच नियोजन करणे आवश्यक होते. मात्र, पाण्यासारख्या अत्यावश्यक बाबीच्या नियोजनाऐवजी 2,500 कोटींच्या समान पाणी योजनेच्या अंमलबजावणीतच पालिका प्रशासनाला रस असल्याने पुणेकरांवर आता दिवसाआड पाणी कपातीचे संकट घोंगावत आहे.
“यंदा उन्हाळ्याचा कडाका अधिक आहे. त्यामुळे बाष्पीभवन वेगाने होत आहे. आतापासूनच पाण्याचे नियोजन करावे,’ अशी पत्र पाटबंधारे विभागाने मार्चपासून महापालिकेला पाठवली आहेत. पण, वाढलेली हद्द तसेच कडक उन्हाळ्याचे कारण पुढे करत महापालिकेने 30 टक्के जादा पाणी उचलले. हे पाणी पुणेकरांनाही मिळत नसल्याने नागरिकांची ओरड सुरू होती. मात्र, नियोजनाऐवजी पालिकेने केवळ पाणी वापर नियंत्रित असल्याचे कागदी घोडे नाचवत धरणसाठ्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे यावर्षी पहिल्यांदाच पालखी सोहळ्यातही पालिकेला चोवीस तास पाणी देता आले नाही. त्यामुळे पाण्याची समस्या गंभीर होणार, याची जाणीव असतानाही प्रशासनाचा फाजिल आत्मविश्वास ऐन पावसाळ्यात पुणेकरांच्या घशाला कोरड पाडण्यास कारणीभूत ठरला आहे.
समान पाणी योजनेतच रस
समान पाणीपुरवठा योजनेचे काम 2017 मध्ये सुरू झाले असून आतापर्यंत ते निम्मेही पूर्ण झालेले नाही. ही योजना मार्च 2023 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यानंतर योजनेच्या ठेकेदारांना मोठा दंड मोजावा लागणार आहे. मात्र, दंडाची काळजी ठेकेदारापेक्षा पालिकेलाच अधिक असल्याने पाण्याच्या नियोजनाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत ही योजना तातडीने पूर्ण कशी होईल, यासाठी प्रशासन रात्रीचा दिवस करत आहे.
समाविष्ट गावांवर खापर फोडण्याचा घाट
भामा-आसखेड योजनेमुळे नगर रस्ता परिसरातील जवळपास 10 लाख लोकांच्या पाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे उर्वरित शहरासाठी खडकवासला धरणसाखळीतील पाणी मात्र महापालिका पूर्वीइतकेच घेत आहे. त्यासाठीचा तीन पट दंड पुणेकरांच्या कराच्या रकमेतून भरला जात आहे. या पाणीपुरवठ्याचे नियोजन करता येत नसल्याने समाविष्ट गावांचे कारण पुढे केले जात आहे. मात्र, या गावांना पालिका पाणीच देत नसल्याने न्यायालयानेही कानउघाडणी केली आहे. उर्वरित शहरात टॅंकरच्या वर्षभरात तब्बल सव्वादोन लाख फेऱ्या झाल्या आहेत. गेल्या पाच वर्षांतील ही विक्रमी आकडेवारी आहे. त्यामुळे शहरातही पालिका पुरेसे पाणी मिळत नाही, हे स्पष्ट आहे.